
करमाळा/प्रतिनिधी


आमदार संजयमामा शिंदे यांनी राजुरी (ता. करमाळा) गावात केलेल्या भरीव विकास कामांमुळे राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील श्री बाळनाथ महाराज परिवर्तन पॅनेल चा विजय निश्चित असल्याचे ठाम मत राजुरी ग्रामपंचायत निवडणुकीचे प्रचार प्रमुख नंदकुमार जगताप यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आजपर्यंत राजुरी गाव विकासापासून वंचित होते. परंतु, संजयमामा सारख्या नेतृत्वाचा परिसस्पर्श तालुक्याला झाला असून त्यांच्या माध्यमातून राजुरी येथील ओढ्यावरील दोन पुलाचे काम पूर्ण झाले आहे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम चालू आहे. राजुरी ते वाशिंबे हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून पूर्ण झाला असून राजुरीसाठी स्वतंत्र वीज उपकेंद्राच्या कामाची वर्क ऑर्डर निघाली आहे. तसेच राजुरी ते मांजरगाव रस्ता व राजुरी चढाचे खोलीकरण करून कॉंक्रिटीकरण करण्यासाठी १ कोटी ७७ लाख रुपयांच्या कामाला मंजुरी लवकरच मिळणार आहे. याशिवाय राजुरी ते पोंधवडी रस्ता व राजुरीच्या गाव कोसालगत असलेल्या रस्त्याचे रुंदीकरण करून सिमेंटची भिंत बांधण्याच्या कामालाही लवकरच मंजुरी मिळणार आहे.
या सर्व भरीव अशा विकास कामामुळे राजुरीतील जनता आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे उभी असून येत्या रविवारी ५ तारखेला होणाऱ्या राजुरी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील श्री बाळनाथ महाराज परिवर्तन पॅनेलचे सरपंच पदासह सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.




