
प्रतिनीधी/ऋषिकेश चव्हाण


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे निरिक्षक राहूल चव्हाण पाटील यांनी “होवू दे चर्चा” या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात व तालुक्यातील वाडी वस्तीवर जावुन थेट भेट अभियान राबवुन सर्व सामान्य जनतेला जागृत करत केंद्र व राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजनांची लक्तरे वेशीवर टांगण्याचं काम चव्हाण पाटील यांनी केले.
तुमच्या खात्यात पंधरा लाख आले का? गॅस, पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाले का? शेतमालाला हमीभाव मिळाला का? नोटबंदीचा फायदा झाला का? महागाई कमी झाली का? जि एस टी मुळे फायदा झाला का? खतांच्या किमती कमी झाल्या का? २ कोटी युवकांना रोजगार मिळाला का? अच्छे दिन आले का? या प्रश्नावर शेतकरी, युवक, महिला यांना बोलते करून केंद्र सरकार विरोधात राहुल चव्हाण पाटील यांनी राळ उडवून दिली. स्थानीक खासदार, आमदार यांच्या कामगिरीवर देखील त्यांनी जोरदार ताशेरे ओढण्याचे काम केले.
गेले महिनाभर या मतदारसंघात तळ ठोकून चव्हाण यांनी कामचुकार पदाधिकाऱ्यांना देखील धारेवर धरले. कागदोपत्री घोडे नाचवनाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून देखील या वेळेस ग्राऊंड लेवलवर काम करून घेतल्याने पक्षांतर्गत आलेली मरगळ देखील झटकल्याचे दिसत आहे. अभियानाच्या दरम्यान जुन्या ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या घरी भेटी देणे, कोणताही बडेजाव न करता कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जेवण करणे यामुळे कार्यकर्त्यात चैतन्य निर्माण झाले. महिला आघाडी, युवासेना, शिव आरोग्य सेना यांच्याकडे नियोजन दिल्यामुळे या देखील आघाड्या सक्रिय झाल्या आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात आलेली मरगळ १५ दिवसाच्या प्रवासात सर्वांना सक्रिय करण्याचा प्रयत्न केला. जास्तीत जास्त गावात व जास्तीत जास्त शिवसैनिक भेटी याला महत्व दिलं. स्वतः राहुल चव्हाण पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील ३५० पेक्षा अधिक गावात स्वतः हजेरी लावली. त्यामुळे होवू दे चर्चा अभियान हे शिवसेना संघटन बळकटी साठी व पक्ष वाढीसाठी महत्वपूर्ण ठरल्याची चर्चा शिवसैनिकात होत आहे. सोशल मिडीयावर, स्थानिक वृत्तपत्र, पोर्टल या द्वारे प्रत्येक तालुक्यातील पत्रकाराशी संवाद साधून त्यांनी होवू दे चर्चा अभियान प्रचंड यशस्वी केल्याने भाजपाने देखील या कार्यक्रमाचा धसका घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
माढा, माळशिरस, सांगोला, करमाळा, फलटण, माण-खटाव, पंढरपूर या प्रत्येक तालुक्यात तळ ठोकून, विभागीय बैठका घेऊन चव्हाण पाटील यांनी प्रत्येक शिवसैनिक, शाखाप्रमुख यांना देखील या अभियानात सक्रिय केले. भविष्यात याचा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी देखील मोठा फायदा होणार असल्याचे चित्र या निमित्ताने निर्माण झाले आहे.



