राजेरावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्याची भारत सरकारकडून दखल; १५ ऑगस्ट च्या ध्वजारोहण समारंभासाठी निमंत्रण

करमाळा/प्रतिनिधी


केंद्र सरकारच्या १०,००० FPO स्थापन करण्याच्या उद्दिष्ट नुसार, वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्या मार्गदर्शनातून आणि नाबार्डच्या अर्थसहाय्यातून राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना २५ मे २०२२ रोजी करमाळा तालुक्यामध्ये करण्यात आली. महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशातून सर्वात जास्त केळी निर्यात सोलापूर जिल्ह्यातून होते. त्यामुळे केळी या प्रमुख पिकावर काम करण्यासाठी राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करण्यात आली.
कंपनीच्या स्थापनेपासूनच मोठे ध्येय घेऊन कंपनीची वाटचाल वॉटर आणि नाबार्ड च्या माध्यमातून सुरू आहे, सध्या कंपनीचे ३८३ सभासद आहेत. प्रत्येक सभासदाचे शुल्क ५ हजार रुपये प्रमाणे जमा केलेले आहे. पहिल्या टप्प्यात कंपनीने उत्कृष्ट दर्जाची केळी उत्पादित करण्यासाठी आवश्यक असलेली एस. ओ. पी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती सुरू केलेली आहे. माती परीक्षण करणे व त्यानुसार खतांची मात्रा देणे हा उपक्रम कंपनीने सभासदांसाठी सुरू केलेला आहे. उत्कृष्ट दर्जाची केळी एक्सपोर्ट करण्याचे राजे रावरंभा कंपनीने उद्दिष्ट ठेवलेले आहे. त्यानुसार एक्स्पोर्ट ची सुरुवात कासवगतीने सुरू आहे, गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये एक कंटेनर दुबई या ठिकाणी एक्सपोर्ट केलेला. निर्यात क्षेत्रामध्ये दर्जेदार काम करणाऱ्या कंपन्यांची डीलरशिप घेऊन त्या कंपन्यांना केळी पुरवठा करण्याचे कामही राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीने सुरू केलेले आहे. सभासदांसाठी माती परीक्षण, खत परीक्षण, ॲग्री मॉल, केळीची रोपे, जैन ठिबक, सह्याद्री कंपनीची विद्राव्य खते कंपनीकडून सभासदांना माफक दरात उपलब्ध करून दिली जातात.
कंपनीच्या या कामाची दखल केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आली असून १५ ऑगस्ट २०२३ रोजी देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त संपन्न होणाऱ्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबद्दलचे निमंत्रण कंपनीचे अध्यक्ष डॉ. विकास प्रभाकर वीर आणि त्यांच्या पत्नी सौ. स्वाती वीर यांना आलेले आहे आणि ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी साहेबांचे खूप खूप आभार- डॉ. विकास वीर
अवघे १ वर्षे वय असलेल्या आमच्या नवीन कंपनीला प्रेरणा देण्यासाठी आणि कंपनीची वाटचाल समजून घेण्यासाठी देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त होणाऱ्या दिल्ली येथील ध्वजारोहण समारंभासाठी चे निमंत्रण भारत सरकारकडून आम्हाला आलेले आहे. १४ तारखेला सकाळी आम्ही दिल्ली येथे पोहोचत आहोत आणि १६ तारखेला दिल्ली येथून परत येणार आहोत. या ३ दिवसांमध्ये ध्वजारोहण समारंभा बरोबरच केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशीही चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे कंपनीच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी हा दिल्ली दौरा खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ही दुर्मिळ संधी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी साहेब यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार
या पुढील काळातही कंपनीला कोल्ड स्टोरेज, क्लिनिंग, ग्रीडींग व प्रोसेसिंग युनिट उभा करण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी, शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाचा दर्जा वाढवण्यासाठी आम्हाला काम करायचे आहे. चांगले दर मिळवून देणारे आणि पैशाचे हमी असणारे एक्सपोर्टर मिळवून देणे यासाठी केंद्र सरकार आणि नाबार्ड व वॉटर चे मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभणार आहे.




