करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या शेती पंपाचा वीज पुरवठा पूर्ववत करावा अशा मागणीचे पत्र ऊर्जामंत्री नितीन राऊत साहेब यांना दिलेले आहे.
सदर पत्रामध्ये ते म्हणतात की, सध्या महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही. तसेच वीज बिले सुद्धा दिलेली नाहीत. वीज बिले वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या शेती पंपाचे विद्युत कनेक्शन तोडले आहे. त्यामुळे ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतातील उभी पिके जळू लागलेली आहेत. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे . यापूर्वी शेतकऱ्यांनी मार्च २०२१ मध्ये शेतीपंपाची वीज बिले भरलेली आहेत. शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकांना भाव नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वीज बिले भरण्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक आहे.

तरी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी शेती पंपाचा विद्युत पुरवठा पूर्ववत करणे बाबत संबंधित विभागास आदेश देण्यात यावेत अशी मागणी आमदार शिंदे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केलेली आहे.




