
प्रतिनिधी/करमाळा


करमाळा तालुक्यातील सरपडोह गावांमध्ये यशाची परंपरा कायम ठेवणारे सागर जयवंत पवार यांचा आज (दि.१० जुलै) रोजी ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार संपन्न झाला. सरपडोह या गावांमध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करणाऱ्या प्रत्येक यशवंताचा नागरी सत्कार करण्याची परंपरा आहे. त्याचप्रमाणे सरपडोह गावातून चौथा पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान सागर जयवंत पवार यांनी मिळवला आहे. यामुळे त्यांची गावामध्ये सवाद्य मिरवणूक काढून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर तालुक्यातील इतर सर्व पोलिस निरीक्षकपदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कारासाठी आमंत्रित केले होते. त्यापैकी ओंकार दत्तात्रय धेंडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. इतर विद्यार्थ्यांना काही कारणास्तव सत्कारासाठी उपस्थित राहता आले नाही.
सरपडोह गावातून जो विद्यार्थी लोकसेवा किंवा राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होईल त्यासाठी काकासाहेब भिताडे मेजर यांच्याकडून पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. यानंतर हनुमंत खरात साहेब व जयवंत आण्णा पवार सर यांनीही प्रत्येक विद्यार्थ्यास पाच हजार रुपये प्रमाणे बक्षीस जाहीर केले आहे. यापुढे गावातील जो विद्यार्थी लोकसेवा किंवा राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होईल त्यास रोख पंधरा हजार रुपये बक्षीस मिळणार आहे.
यावेळी गावचे सरपंच मालनताई पांडुरंग वाळके, उपसरपंच नाथराव रंदवे, राष्ट्रीय मानवाधिकार राज्य संपर्कप्रमुख शामराव ननवरे गुरुजी, सेवानिवृत्त उपकार्यकारी अभियंता हनुमंत खरात, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन लक्ष्मण मारुती खराडे, अनिल माने सेक्रेटरी भाऊसाहेब, ओसीसीआय संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश ननवरे, अरूण चौगुले सर, सुनील भिमराव गायकवाड मेजर, गणेश घोगरे, संतोष आरणे महाराज, पोलिस पाटील अंकूश खरात, ग्रामपंचायत सदस्य दत्ता मोरे, भानुदास शिंदे, बाळासाहेब गवारे, विनायक पवार, कालिदास पाटील सर, शहाजी ढावरे, काकासाहेब भिताडे, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, हर्षवर्धन गाडे तसेच गावातील ग्रामस्थ, महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी परंडा तालुक्यातील सागर पवार यांचे स्नेही व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश घोगरे तर सूत्रसंचालन नाथराव रंदवे व आभार प्रदर्शन अरूण चौगुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गावातील सर्वच युवकांनी परिश्रम घेतले.



