
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


उजनी जलाशयावरील बहुचर्चित अशा अहमदनगर, पुणे आणि सोलापूर या तीनही जिल्ह्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या डिकसळ पुलाची निविदा अंतिम झाली आहे. त्यामुळे या पुलाच्या निर्मितीचा मार्ग आत्ता मोकळा झाला असून बरेच दिवसापासून या भागातील नागरिकांची या ब्रिटिश कालीन डिकसळ पुलाच्या उभारण्यासाठी मागणी होती.
तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने या पुलाला ५० कोटी रुपयाच्या निधीची मंजुरी मिळाली होती. दरम्यान कोरोनाच्या काळानंतर राज्यात सत्तातर झाल्यामुळे या निधीला स्थगिती मिळाली होती. परंतु आमदार संजयमामा शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या प्रयत्नांना यश आले आहे.
बुधवार दिनांक २३ मे रोजी या पुलाची निविदा विजय पटेल कंपनी ला मिळाली असून ३८ कोटी ६६ लाख ३१ हजार ४७० रुपये निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे. उर्वरित मंजूर निधी मधून सदर पुलाला जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांची निर्मिती केली जाणार आहे. या निर्णयामुळे करमाळा आणि इंदापूर तालुक्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.



