-->
करमाळाराज्यविशेष

अहमदनगर येथील हमाल मापाडी राज्यव्यापी अधिवेशनासाठी करमाळ्यातून ४० वाहने जाणार- ॲड. राहुल सावंत

 

प्रतिनिधी/अलीम शेख

 

महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे द्वैवार्षिक अधिवेशन अहमदनगर येथे दि. २१ मे रोजी होत असून या अधिवेशनासाठी करमाळा शहर व तालुक्यातील हमाल, मापाडी, शेतमजूर, असंघटित क्षेत्रातील अनेक कामगार ४० वाहनातून सकाळी सात वाजता जाणार असल्याची माहिती करमाळा तालुका हमाल पंचायत चे अध्यक्ष ॲड. राहुल सावंत यांनी दिली.

 

यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, या राज्यव्यापी अधिवेशनासाठी देशाचे नेते आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार हे उपस्थित राहून कामगारांना मार्गदर्शन करणार असून महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

 

तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री, आ. धनंजय मुंडे व आदर्श गाव योजनेचे प्रणेते पोपटराव पवार उपस्थित राहणार आहेत. रविवार दि. २१ मे रोजी सकाळी दहा वाजल्यापासून अहमदनगर येथील बाजार समिती परिसरात सुरू होणाऱ्या अधिवेशनाचे जय्यत तयारी व स्वागत अध्यक्ष आ. संग्राम जगताप आणि संयोजक व जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले हे करीत आहेत.

 

या अधिवेशनात राज्यभर माथाडी कायद्याचे अनेक प्रश्न प्रलंबित असून त्याच्या अंमलबजावणी कडे सरकार, प्रशासन व माथाडी मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे; त्याचा फटका प्रत्यक्ष काम करणाऱ्या माथाडी कामगारांना बसत आहे. त्यामुळे हे अधिवेशन कोणत्याही परिस्थितीत माथाडी कायद्याचे काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे या मुद्द्यावर केंद्रित करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीस महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, उपाध्यक्ष डॉ. हरीश धुरट, राजकुमार घायाळ, विकास मगदूम, सरचिटणीस सुभाष लोमटे, अविनाश घुले, शिवाजी शिंदे, आप्पा खताळ, हनुमंत बहिरट यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. देश विदेशात प्रशंसा होत असलेल्या व आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नावाजलेल्या माथाडी कायद्याची बदनामी सरकारमधील काही मंडळी जाणीवपूर्वक करीत असल्याचा निषेध या बैठकीत करण्यात आला.

 

माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी न केल्याने हजारो माथाडी कामगार बेरोजगार होऊन राज्यात देशोधडीला लागले आहेत. काही बाजार समितीत कायद्याची अंमलबजावणी न होणे, खाजगी बाजारात प्रोत्साहन देणे, शासकीय धान्य गोदामात गरज नसताना खाजगी कंत्राटदारांची नेमणूक करून सरकारच्या पैशाची लूट करून माथाडी कामगार वरील मनमानी नोंदी, माथाडी कामगारांना योग्य संरक्षण न दिले जाणे, मालक व कंत्राटदारांना पावलो पावली झुकते माप, मालका कडील थकबाकी वसुलीस विलंब लावणे, मजुरी वाढीच्या करारास विलंब लावू नये, माथाडी मंडळाची मनमानी, माथाडी मंडळाच्या कामकाजात सरकारचा बेकायदेशीर हस्तक्षेप आदी मुद्द्यांचा समावेश या अधिवेशनात होणार आहे.

 

माथाडी कायद्यामुळे हजारो हमाल, कष्टकरी वर्गाचे संसार जगणे अधिक सुकर झाले आहे. म्हणूनच कोणतेही गैरकृत्यास सरकारने पाठीशी न घालता त्यास वेळेस आवर घालावा. पण त्याऐवजी जर माथाडी कायद्यास बदनाम करणार असतील तर हे महामंडळ त्याविरुद्ध राज्यभर सत्याग्रह व गरज पडल्यास जेलभरो आंदोलन करेल यासाठी अधिवेशन होणार आहे. राज्यव्यापी अधिवेशन असल्याने हमाल मापाडी व अन्य संघटित कष्टकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. राहुल सावंत यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close