-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

नामदार तानाजी सावंत यांच्यामुळेच आदिनाथ कारखाना वाचला- प्रा. रामदास झोळ

 

करमाळा/प्रतिनिधी

 

आदिनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी नामदार तानाजीराव सावंत यांनी स्वतःच्या खिशातले बारा कोटी रुपये दिले व कारखाना वाचवला. खऱ्या अर्थाने आदिनाथ कारखाना वाचवण्याचे श्रेय प्रा. तानाजीराव सावंत यांनाच असून यात प्रमुख भूमिका असलेल्या बचाव समितीचे महत्त्व कोणीही नाकारू शकत नाही. बचाव समितीचे सदस्य दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रा. रामदास झोळ यांनी व्यक्त केली.

 

आदिनाथ साखर कारखाना वाचवण्यासाठी प्रमुख भूमिका बजावलेल्या आदिनाथ बचाव समितीच्या सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम फुटजळगाव येथे ठेवण्यात आला होता. बचाव समितीचे निमंत्रक हरिदास डांगे, प्रा. जयप्रकाश बिले आदींचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी बोलताना प्रा. रामदास झोळ म्हणाले की, कारखान्याचे खाजगीकरण झाले असते तर एक पुढारी सुद्धा निवडणुकीला इच्छुक राहिला नसता. आता बचाव समितीमुळे कारखाना सहकार तत्त्वावर राहिल्यामुळे अनेकांना स्वतःच्या राजकारणासाठी आदिनाथ ची गरज वाटू लागली आहे. आदिनाथ चा होणारा संचालक हा आदिनाथ मधून पैसे घरी घेऊन जाणारा नसावा तर आदिनाथला अडचणीत आल्यावर घरून पैसे आणून देणार असावा.

 

आता अनेक जण म्हणतात की, माझ्यामुळे कारखाना वाचला हे चुकीचे आहे. करमाळा तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. बचाव समितीच्या आवाहनानुसार आदिनाथ कारखान्याची निवडणूक बिनविरोध करावी व खऱ्या अर्थाने कारखान्याची काळजी असेल तर प्रत्येक गटाच्या पुढाऱ्यांनी आपल्या गटातील दोन-तीन नावे संचालक पदासाठी सुचवून कारखाना बिनविरोध करावा.

 

आतापर्यंत कारखान्याचा वापर राजकारणासाठी केला. मात्र, आता कारखान्याचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याची वेळ आली आहे. बचाव समितीने आवाहन केले आहे, आदिनाथ कारखाना बिनविरोध करावा. या आमच्या भूमिकेवर तालुक्यातील सर्व राजकीय गटाने आपले मत व्यक्त करावे. असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close