अतिवृष्टी नुकसान भरपाई चे ५५ कोटी रुपये करमाळ्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा !
एकनाथ शिंदे यांनी शब्द पाळला; जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले होते प्रयत्न!!

करमाळा/प्रतिनिधी


सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हंगामातील पिकांची नुकसान भरपाई करमाळा तालुक्यातील ३० हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ५५ कोटी रुपये आज जमा झाले असून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाने पैसे जमा केल्यामुळे शेतकरी संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धन्यवाद देत आहेत.
खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्यामुळे मूग, तूर, कांदा, उडीद आणि फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने तात्काळ पंचनामे झाली होती. या नुकसान भरपाई चे पैसे तात्काळ शेतकऱ्यांना मिळावे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून समक्ष निवेदन दिले होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील करमाळा दौऱ्यावर आल्यानंतर सुद्धा बार्शीतील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पण करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही ही बाब पालकमंत्र्याच्या निदर्शनास चिवटे यांनी आणून दिली होती.
महाराष्ट्र शासनाने डीबीटी म्हणजेच डायरेक्ट मनी ट्रान्सफर योजनेमार्फत प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पैसे जमा केले आहेत. यामुळे करमाळातील शेतकऱ्यांचा आनंद व्यक्त होत आहे.
श्री एकनाथ शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे नुकसान भरपाई जमा केल्यामुळे करमाळा तालुक्यातील शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
अतिवृष्टी मुळे माझे उडीद पिकाची नुकसान झाले होते या नुकसान भरपाई पोटी आठ हजार रुपये आज माझ्या खात्यावर जमा झाले आहेत अत्यंत अडचणीच्या काळात ही आठ हजार रुपये मला मिळाल्यामुळे आनंद होत आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या पद्धतीने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम असून त्यांच्या पाठीमागे अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील जनता उभा राहणार आहे.
नागेश चेंडगे, शेतकरी कोळगाव




