-->
करमाळाराजकिय

शंभुराजे जगताप यांनी मांडलेली वस्तूस्थिती बागल गटाच्या नेत्यांनी टिका समजू नये- वनराज घोलप

 

करमाळा/प्रतिनिधी

 

कृषी प्रदर्शनाचा फार्स करण्याऐवजी बागल गटाच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करून शेतकरी व कामगारांची देणी देऊन त्यांना दिलासा द्यायला हवा होता. शंभूराजे जगताप यांनी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतुकदार व कारखान्याचे कामगार यांच्या देण्या बद्दलची प्रसार माध्यमांसमोर मांडलेली वस्तूस्थिती बागल गटाच्या नेत्यांनी टिका समजू नये. असे मत किंग्ज फाऊंडेशनचे अध्यक्ष वनराज घोलप यांनी व्यक्त केले आहे.

 

करमाळा तालुक्यातील आदिनाथ व मकाई या सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून स्वतः च्या कुटुंबाची प्रगती करून घेतलेल्या बागल गटाच्या नेत्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कळवळ्याच्या नावाखाली स्व. दिगंबर बागल मामा यांच्या जंयती निमीत्त दि. ९ मार्च पासून २-३ दिवस कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. आदिनाथ व मकाईच्या कामगारांच्या रखडलेल्या पगारीमुळे कित्येक कामगारांची कुटुंबे उध्वस्त झाली आहेत. काही कामगारांनी आत्महत्या केल्यामुळे, आर्थिक चणचणी च्या तणावाखाली जगत असताना काहींना हर्ट अटॅक येऊन जीव गमवावे लागले आहेत. त्यांना रोजीरोटी साठी मोल-मजूरी करावी लागत आहे. त्यांच्या मुलाबाळांची परवड झाली आहे.

 

ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर बागल गटाच्या नेत्यांनी इस्टेटी कमावल्या त्यांच्या घामाचा दाम तात्काळ देण्याऐवजी तालुक्यातील जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी कृषी प्रदर्षनाचा आव आणला आहे. मकाईचे चेअरमन दिग्वीजय बागल यांनी १५ एप्रिल पर्यंत शेतकऱ्यांचे ऊस बील देवू असे आश्वासन दिले आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कामगार व वाहतूकदारांच्या थकीत बिलांबाबत असेच आश्वासन २०१९ च्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी गटाच्या नेत्या रश्मी दिदी बागल यांनी दिली होते, पण त्याची पूर्तता तर त्यांनी केलीच नाही ऊलट शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता कारखान्यावर ईतर कार्यकर्त्यांसह बिलाबाबत विचारणा करायला गेला असता मकाईचे चेअरमन दिग्वीजय बागल यांनी हक्काचे पैसे मागायला गेलेल्या शेतकरी पुत्रास चेअरमन पदास न शोभणारी मारहाण व दमबाजी करून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला

 

निष्ठा वेशीला टांगून स्वार्थ – सोयिस्कर व फसवा-फसवी ची राजकिय वाटचाल आज पर्यंत या बागल गटाने केली आहे. यात मग गटाचे किंग मेकर व जवळचे नातेवाईक काकांना सुध्दा बागल कुटूंबियांनी सोडले नाही. त्यांच्या सोबत पेट्रोल पंपाच्या वाटणी वरून वाद केला. गावा – गावात कारखान्याच्या कामगारांना हाताशी धरून ऊस नोंदी पासून ऊस तुटे पर्यंत खालच्या पातळीचे राजकारण करून सहकारी साखर कारखाने असताना खासगी पॉपर्टी समजून शेतकऱ्यांची पिळवणूक केली आहे. खरं तर नुकतेच शेतकरी, कामगार व वाहतुकदारांच्या मागील देण्यांबाबत जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी प्रसारमाध्यमांमधून आवाज उठवला व वस्तूस्थिती मांडली तर ते जिव्हारी लागून घेवून बागल गटाचे नेते त्याला टिका म्हणत आहेत.

 

शेतकऱ्यांच्या थकित बिलाबाबत उपाय योजना करण्या ऐवजी कृषी प्रदर्शनात गर्दी करण्यासाठी पाळणे-झोपाळे निमंत्रीत केले आहेत. प्रदर्शनात स्टॉल्स च्या नावाखाली फक्त पैसा कमावण्यासाठी प्रदर्शन भरवले आहे काय ? असे सामान्य नागरिकांना वाटत आहे. मी एक छोटा सामाजिक कार्यकर्ता आहे. बागल गटाच्या नेत्यांबाबत तालुक्यातील नागरिकांत एकप्रकारची चीड जाणवत आहे. वास्तविक पाहता या नेत्यांनी आत्मपरिक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. असेही शेवटी घोलप यांनी म्हटले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close