
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


समाज मनाचे वास्तव चित्रण करून ते चित्रपटाच्या माध्यमातून समाजासमोर मांडणारे चित्रपट हे खऱ्या अर्थाने समाज प्रबोधनाची भूमिका बजावतात असे मत मदार चित्रपटाचे दिग्दर्शक, करमाळयाचे सुपुत्र मंगेश बदर यांनी व्यक्त केले. डिजीटल मिडीया पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष, सा. पवनपुत्रचे संपादक, पत्रकार दिनेश मडके यांच्या घरी सदिच्छा भेट प्रसंगी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. दिनेश मडके, अमरजित साळुंखे यांच्या हस्ते तसेच मित्र परिवाराच्या वतीने फेटा, हार व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मदार चित्रपटातील कलाकार अमृता अग्रवाल, झांगडू चित्रपटातील कलाकार माधुरी परदेशी, सौ. सुवर्णा मडके, भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंखे, अरिहंत प्रिटंर्सचे मालक आशिष मेहता, पत्रकार नरेंद्रसिंह ठाकुर आदी मित्र परिवार उपस्थित होते.
या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की, मदार चित्रपटाच्या माध्यमातून समाजाचे वास्तव चित्रण, खेड्या गावातील समस्या व त्यांचे समर्पक चित्रण दाखविण्यात आले आहे. विशेषत गावामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती असते. त्यावेळी गावकऱ्यांचे हाल कसे होतात आणि त्याचा गाव गाड्यावर काय परिणाम होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एकूणच व्यक्ती, जनावरे, शेती, उद्योग या साऱ्या घटकावर याचा परिणाम होतो. हे चित्रण जोपर्यंत आपण समाजापर्यंत मांडत नाही तोपर्यंत त्यावर उपायोजना होणार नाहीत. दुष्काळबाबत बोलायचे झाल्यास अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत नेहमीच असतो. धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. पाण्याच्या नैसर्गिक स्तोत्र पासुन जलसमृद्धी कशी साधता येईल या गोष्टीचा विचार व्हायला हवा. बऱ्याच नद्यांमधून पाणी वाहून समुद्रास मिळते असे पाणी उपयोगात येत नाही. पावसाळ्यातील पुरामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाहुन जाते. पुरामुळे पर्यावरणाचे मालमत्तेचे नुकसान होते. मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. या सर्व बाबीवर गांभीर्याने विचार केला तर दुष्काळाला नक्की आळा बसेल. यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मदार हा संपूर्ण चित्रपट घोटी, करमाळा आणि केम या ठिकाणी चित्रित करण्यात आलेला आहे. या चित्रपटाची महाराष्ट्र शासन अधिकृत २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये मराठी चित्रपट स्पर्धा विभागात निवड झालेली आहे. या विभागात महाराष्ट्रातून फक्त सात चित्रपट निवडले होते. त्यामध्ये मदार या चित्रपटाला ५ पुरस्कार मिळाले आहेत. पुणे येथे २ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी यादरम्यान हा फेस्टिवल झाला.
भविष्यातील चित्रपट हे ग्रामीण भागातील तरुणांच्या समस्या, शिक्षण, शेतकऱ्यांच्या समस्या, यावर आधारित असणार आहेत यासाठी त्यांचे लेखन चालू आहे. लवकरच पुढील चित्रपट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



