
करमाळा/प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील उजनी पात्रातून जाणारा डिकसळ पूल कमकुवत झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ लाख रुपये खर्च करून मोठे मोठे लोखंडी गरडेल टाकून हा ब्रिटिश कालीन पुल जड वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र काही समाजकंटकांनी जीसीबी लावून हा लोखंडी मजबूत गरडेल तोडला व चोरी करून नेला. अनेक संघटनांनी या चोरांवर कारवाई करावी व हा पूल वाहतुकीसाठी बंद करावा अशी लेखी मागणी केली होती पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी राजकीय दबावापोटी या चोरांवर कारवाई केली नाही. यामुळे आता सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असताना व सर्वसामान्यांच्या जीविताला धोका निर्माण केल्याबद्दल बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी. अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेनेने केली आहे.
इंग्रजांच्या काळातील असलेला डिकसळ पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. यामुळे हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र उसाचा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस वाहतूकदारांनी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या साखर सम्राट यांनी जेसीबी लावून गरडील तोडून टाकले व यावरून २५ ते ३० टन वजनाची वाहतूक चालू केली. यामुळे दोनच महिन्यात हा पूल खचला व याचा काही भाग पाण्यात पडला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. पुलाखाली जवळपास दोनशे ते अडीचशे फूट खोल पाणी असून यात एखादा ट्रॅक्टर, ट्रक मजुरासह कोसळली असती तर मोठी जीवित हानी झाली असती.
बारामती ॲग्रो चे सुभाष गुळवे यांनी या पडलेल्या पुलांची पाहणी केल्याचे फोटोसह प्रसिद्धी दिली आहे. मात्र हा पूल पाडण्यासाठी बारामती ॲग्रो, अंबालिका हे कारखाने जबाबदार आहेत. या कारखान्याच्या दबावामुळेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या सर्व गैरप्रकाराकडे दुर्लक्ष केले.
या सर्व प्रकाराला सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल व मनुष्याच्या जीविताला हानी होईल अशी परिस्थिती निर्माण केल्याबद्दल गुन्हे दाखल करून त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे व हे लाखो रुपये किमतीचे लोखंडी गरडेल चोरून नेणाऱ्या चोरांना पकडून कडक कारवाई करावी. अशी मागणी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे.




