आदिनाथच्या मोळीपुजन कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू; प्रा. शिवाजी सावंत व शासकीय अधिकाऱ्यांनी केली कार्यक्रम स्थळाची पाहणी

करमाळा/प्रतिनिधी


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत रविवार (२५डिसेंबर) रोजी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर होणाऱ्या मोळी पूजन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी आज प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी करून नियोजना संदर्भात योग्य त्या सूचना दिल्या.
या प्रसंगी माजी आमदार नारायण आबा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तालुका प्रमुख देवानंद बागल, आदिनाथ साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे, माजी कार्य. संचालक हरिदास डांगे, रमेश कांबळे, नितीन जगदाळे, नाना लोकरे, युवा सेनेचे निखिल चांदगुडे, राहुल कानगुडे, विशाल गायकवाड, नागेश गुरव, आजिनाथ वस्ताद आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रम स्थळावर असलेले हेलिपॅड व व्यासपीठ या संदर्भातील योग्य त्या सूचना पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल हिरे व पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिल्या. तसेच महसूल प्रशासनाच्या वतीने तहसीलदार समीर माने यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली.
कारखान्यावर दहा हजार जनसमुदाय बसेल एवढ्या सभा मंडपाची तयारी सुरू केली असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, आदिनाथ कारखान्याचे सर्व संचालक व कर्मचारी काम करत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील जनतेने उपस्थित राहून मुख्यमंत्र्यावरील प्रेम व्यक्त करावे- जिल्हाप्रमुख महेश चिवटे
आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती ॲग्रो च्या तावडीतून काढून सर्वसामान्य सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांची महत्त्वाची भूमिका आहे. आदिनाथ कारखान्याच्या मोळी टाकण्याचा होणारा कार्यक्रम हा करमाळा तालुक्याच्या इतिहासातला परिवर्तन करणारा दिवस आहे. या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी करमाळा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, कष्टकरी, मजूर व सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपण सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहोत हे दाखवून देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे.
आदिनाथ बचाव समितीने हा लढा उभा केल्यानंतर अनेकांना हे अशक्य वाटत होते. पण आदिनाथ महाराजांच्या कृपेने राज्यात सरकार बदलले एकनाथाच्या रूपाने तालुक्याला नाथ मिळाला व प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या रूपाने आदिनाथ साठी परीस मिळाला. यांच्या सहकार्य, आशीर्वादामुळे हा कारखाना सुरू होत आहे. हा कारखाना कायमस्वरूपी सहकाराच्या मालकीचाच राहावा, शेतकऱ्यांच्या मालकीचाच राहावा ही सभासदांची इच्छा आदिनाथ महाराजांनी पूर्ण केली आहे.
श्री. हरिदास डांगे, आदिनाथ बचाव समिती.




