करमाळा तालुक्यासाठी नुकसान भरपाईपोटी ४८ कोटी ६० लाख निधी येणार- आ. संजयमामा शिंदे

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे करमाळा तालुक्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. या पावसामुळे जिरायती, बागायती क्षेत्रांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते. सदर नुकसानीचे पंचनामे ०१ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण केलेले असून सदर नुकसान भरपाई पोटी ४८ कोटी ६० लाख रुपयांची मागणी शासनाकडे केलेली असून सदर निधी लवकरच मंजूर होऊन तो संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वर्ग होईल अशी माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, १५२५३ हेक्टर जीरायती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले असून या क्षेत्रावरील २१४७५ खातेदारांच्या नुकसानीचे पंचनामे केलेले आहेत त्यांना जिरायत क्षेत्राप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल. ८३०९ हेक्टर बागायती क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झालेले होते. या बागायती क्षेत्रातील ११८४२ खातेदारांना बागायती क्षेत्राचा नुकसान भरपाई मोबदला दिला जाईल. तसेच १५०५ हेक्टर फळबागा खालील क्षेत्र बाधित होते त्यांच्या २००२ खातेदारांना नुकसान भरपाई चा मोबदला मिळणार आहे.
तालुक्यातील एकूण ३५३१९ खातेदारांचे २५०६८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालेले होते. सदर नुकसानीपोटी ४८ कोटी ६० लाख रुपये निधी येणार असल्याचेही त्यांनी यावेळेस सांगितले.
लंम्पी आजाराने मृत जनावरांच्या नुकसान भरपाई पोटी १९ लाख ५० हजार निधी मिळणार
ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टी बरोबरच जनावरांना होणाऱ्या लंम्पी आजाराने तालुक्यामध्ये थैमान घातलेले आहे. या आजाराने आत्तापर्यंत ८० जनावरांचा मृत्यू झालेला असून या प्रत्येक जनावरांसाठी ३० हजार याप्रमाणे ८० जनावरांसाठी १९ लाख ५० हजार निधी मिळणार असल्याचेही आमदार शिंदे यांनी सांगितले.




