
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


राज्य सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून ज्या कुटुंबांना शासनाकडून तीन रुपये प्रति किलो तांदूळ व दोन रुपये प्रति किलो गहू या दराने अन्नधान्य अनुज्ञेय आहे. त्या सर्व शिधापत्रिका धारकांना दिवाळी निमित्त रेशन दुकानातून अल्प दरात ‘आनंदाचा शिधा’ संचाचे वितरण करण्यात आले आहे.
या एका संचामध्ये चणाडाळ एक किलो, रवा एक किलो, साखर एक किलो व पामतेल एक लिटर या चार शिधावस्तू समाविष्ट असून या शिधावस्तु संचाची किंमत केवळ १००/- रुपये एवढी आहे.
पॉज मशीनमध्ये ‘आनंदाचा शिधा’ या संचातील वस्तू समाविष्ट नसल्यामुळे सर्व शिधापत्रिका धारकांना ऑफलाइन पद्धतीने या संचाचे वितरण करण्यात आले. वडगाव येथील जवळपास ९०% शिधापत्रिकाधारकांना या संचाचे वितरण केले असून उर्वरित ग्रामस्थांनी लवकरात लवकर आपला शिधावस्तुंचा संच घेऊन जावे. असे आवाहन रेशन दुकानदार श्री. रघुनाथ काळे यांनी केले आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी दिवाळी या सणाला अल्प दरात शिधा वस्तू उपलब्ध करून त्याचे लवकर वितरण केल्याबद्दल नागरिकांनी राज्य सरकार बद्दल समाधान व्यक्त केले.



