हिवरे जि. प. शाळा व्यवस्थापन समीतीचा स्तुत्य उपक्रम; महिला आरोग्य शिबीरात १६८ महिलांची तपासणी

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


नवरात्र महोत्सवा निमित्त हिवरे जिल्हापरिषद प्राथमिक शाळेचे शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष शंभूराजे फरतडे यांनी आयोजित केलेल्या महिला आरोग्य तपासणी शिबीरात १६८ महिला व किशोरवयीन मुलींची मोफत आरोग्य तपासणी व करुन औषधोपचार देण्यात आले. या वेळेस जवळपास ५६ महिला व विद्यार्थिनींची रक्त तपासणी द्वारे (CBC, BSL, TFT) हिमोग्लोबीन, शुगर व ब्लडप्रेशर चेक करण्यात आले. यासाठी खासगी लॅब मध्ये प्रत्येकी एक हजार ते बाराशे रुपये मोजावे लागतात.
या शिबिराचे उद्घाटन करमाळा तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रद्धा भोंडवे, वरकुटे उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. कोमल शिर्के-दुधे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस सरपंच सुनिताताई दत्तात्रय माळी, उपसरपंच मैनाताई दिलीपभाऊ फरतडे, शाळा व्यवस्थापन समीती सदस्या स्वाती नाना ठोंबरे, अश्विनी सुभाष फरतडे, चित्रा जोतीराम शिंदे, सुरेखा दत्तात्रय खाडे, सूकेशनी नवनाथ फरतडे उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना डाॅ. भोंडवे म्हणाल्या की, घरातील स्त्री आपल्या कुटुंबासाठी विविध भूमिका अदा करत असताना तिचे स्वत:च्या प्रकृतीकडे दुर्लक्ष होते. कुटुंबाप्रति असणारी प्रेमाची भावना, मातृत्वाचा ओलावा आणि आपल्या कर्तव्याप्रती असणारी संवेदनशीलता यामुळे ती घरासाठी राबते. प्रसंगी स्वत:च्या गरजा, भावना, शरीर, प्रकृती याकडे लक्ष देत नाही. अशा महिलांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व आयोजित होणारी शिबीरे हे वरदान असून महिलांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका यांच्या माध्यमातून वेळेत उपचार करुन घ्यावेत असे आवाहन केले.
वरकुटे उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल शिर्के-दुधे यावेळी बोलताना म्हणाल्या की, महिला रूग्णांचे आरोग्याबाबत समुपदेशन आवश्यक आहे. एक स्त्रीच दुसर्या स्त्रीच्या वेदना अधिक चांगल्याप्रकारे समजू शकते. त्यामुळे येणाऱ्या स्त्री रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. कुटुंबातील महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असेल, तर संपूर्ण कुटुंबाचेही आरोग्य चांगले राहू शकते. त्यामुळे महिलांच्या आरोग्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले.
करमाळा शहरातील रेवती हाॅस्पिटल मधील डाॅ. उमेशकुमार जाधव व डाॅ. उर्मिला जाधव यांनी या शिबिरास चार हजार रुपयांचे मेडिसिन उपलब्ध करुन दिले. तसेच दोघांनी या शिबिरास हजेरी लावून रुग्णांची तपासणी केली. या वेळेस बोलताना स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅ. उर्मिला जाधव म्हणाल्या ग्रामीण भागात आजही महिलांचे आरोग्य व आजाराबाबत कोणी जाहीरपणे बोलत नाहीत. त्यामुळे महिला आजाराची प्राथमिक लक्षणे जाणवू लागल्यानंतर उपचारासाठी तत्काळ डॉक्टरांकडे जात नाहीत. परिणामी आजार वाढत जाताना दिसतो. पण डाॅक्टर महिला स्त्रीरोग तज्ज्ञ असेल, तर महिलांना त्यांच्या अडचणी सांगणे अधिक सोपे जाते. हे मी अनुभवाने सांगते. महिलांनी स्वत:साठी वेळ काढून आजार अंगावर काढणे टाळावे, कारण अंगावर दुखणे काढल्याने आजार बळावत जातात व त्याचे गंभीर परिणाम कुटुंबाला भोगावे लागतात. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी भरपूर पाणी प्यावे, ताजे व स्वच्छ जेवण वेळेवर करावे. शौचास जाण्यास उशीर करु नये असे आवाहन केले.
या शिबिरात डाॅ. सुहास शिंदे, आरोग्य लॅब टेक्निशिय रणजीत काळे, मनोज पद्माळे, आरोग्य सेवीका सुरेखा खोबरे, कल्पना माने, आशा सेवीका मनिषा फरतडे, शारदा डौले, अनुसया पवळ, संगीता ओहोळ, राणी डिसले यांनी रुग्णांवर उपचार केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुग्रीव निळ, सहशिकक्षक निळकंठ हनपुडे, जालिंदर हराळे, सतिश सुर्यवंशी, नवनाथ खरात, सुरेश शिंदे, पल्लवी कुलकर्णी, दुधाळ गुरुजी, अंकुश माने, उपाध्यक्ष सिद्धेश्वर शिंदे आदींनी परिश्रम घेतले.




