५ जानेवारी पासून दहिगाव आवर्तन सुरू करण्याची शिफारस कालवा सल्लागार समितीकडे करणार- आ. संजयमामा शिंदे
दहिगाव उपसा सिंचन योजना - रब्बी व उन्हाळी आवर्तन आढावा बैठक संपन्न

करमाळा/प्रतिनिधी


करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेची आढावा बैठक आ. संजयमामा शिंदे यांचे अध्यक्षतेखाली म्हैसगाव येथे संपन्न झाली. या बैठकीला जलविद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. किं. वा. चौकडे, उपअभियंता पी. पी. घारे, शाखा अभियंता शा. अ. तरंगे, मेकॅनिकल विभागाचे उपअभियंता सं. प्र. पाटील, आ. बा. गोरे, स्थापत्य विभागाचे उपअभियंता अवताडे एस. के, आ. संजयमामा शिंदे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. विकास वीर, प्रणित शिंदे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये दहीगाव उपसा सिंचन योजना टप्पा १ व टप्पा २ आवर्तन सुरू करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी वरती चर्चा करण्यात आली. ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी टप्पा १ व टप्पा २ येथील जलविद्युत, यांत्रिकी व स्थापत्य विभागाने आपली सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत. ५ जानेवारी पूर्वी पंपांची ट्रायल घेण्यात यावी. ५ जानेवारी २०२३ पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे व १५ डिसेंबर पासून सीना माढा बोगद्याचे आवर्तन सुरू करावे. अशी शिफारस आपण कालवा सल्लागार समितीकडे करणार असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी यावेळी दिली.
दहीगावचे रब्बी आवर्तन ५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत चालवले जाईल तर उन्हाळी आवर्तन ५ मार्चपासून अखेर पर्यंत चालवले जाईल. अशी शिफारस आपण कालवा सल्लागार समितीकडे करणार असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी यावेळी दिली. दहीगाव उपसा सिंचन योजनेचे सर्व पंप १०० % क्षमतेने कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने सर्वच विभागांनी आपापले काम वेळेत पूर्ण करावे. तसेच टप्पा १ व टप्पा २ या ठिकाणी कॅनॉल वरती असलेले सायफण काढून टाकावेत. टेल ला पूर्ण क्षमतेने पाणी कसे जाईल याचे नियोजन करावे अशा सूचना आमदार शिंदे यांनी यावेळी दिल्या.
पोटेगाव बंधारा दुरुस्तीचे काम मे २०२३ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन – आ. शिंदे
करमाळा तालुक्यातील सीना नदीवरील पोटेगाव हा महत्त्वाचा बंधारा आहे. सदर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या विस्तार सुधार या योजनेमधून ४ कोटी १५ लाख रुपये निधीचे अंदाजपत्रक तयार केलेले असून सदर बंधारे ची बंधाऱ्याची दुरुस्ती मे २०२३ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन असून जूनच्या पावसाळ्यामध्ये सदर बंधाऱ्यात १०० % पाणी साठवण्याची क्षमता असेल अशी माहिती आ.संजयमामा शिंदे यांनी दिली.




