आ.संजय शिंदेंच्या पाठपुराव्याला यश; ‘या’ तीन साठवण तलावाच्या भूसंपादनासाठी ५ कोटी निधी मंजूर
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील अर्जुननगर, निंभोरे व विहाळ येथील पाटबंधारे विभागाच्या साठवण तलावात गेलेल्या जमिनींचा भूसंपादन मोबदला वर्षानुवर्षांपासून शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता. संबंधित विषयी पाटबंधारे विभागाला पत्र देऊन व त्याचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या तीन गावांसाठी ५ कोटी ५ लाख निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
साठवण तलाव अर्जुननगर, विहाळ व निंभोरे या तलावामध्ये बाधित झालेल्या जमिनीचा मावेजा अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता. मा. आ. संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे साठवण तलाव अर्जुननगर या तलावाच्या भूसंपादन साठी रु ७९.४८ लक्ष, साठवण तलाव निंभोरे या तलावाच्या भूसंपादनासाठी १ कोटी ८१ लक्ष व साठवण तलाव विहाळ या तलावाच्या भूसंपादनसाठी २ कोटी ४५ लक्ष असा एकूण ५ कोटी ५ लाख निधी मिळालेला आहे. संबंधित शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर या निधीचे वाटप केले जाईल अशी माहिती अ.चं. कदम, जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
आ. संजयमामा शिंदे यांचे मनापासून आभार
आमच्या निंभोरे गावातील साठवण तलाव जवळपास २० वर्षांपूर्वी झालेला होता. सदर तलावात २२ शेतकऱ्यांची ०९ हेक्टर २६ आर जमीन गेलेली होती. तेव्हापासून शेतकरी भूसंपादनाच्या मोबदल्यापासून वंचित होते. या प्रलंबित प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी आ. संजयमामा शिंदे यांच्याकडे केली असता मामांनी तात्काळ जलसंधारण विभागाकडे पाठपुरावा केल्यामुळे निंभोरे येथील तलावासाठी १ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याबद्दल आमचे सर्व ग्रामस्थ आमदार शिंदे यांचे मनापासून आभारी आहेत.
रविंद्र वळेकर, ग्रामस्थ, निंभोरे




