अखेर..आदिनाथ बचाव समितीच्या मागणीला यश; २० मार्चला होणार सर्वसाधारण सभा
बारामती ॲग्रो चा भाडे करार रद्द करण्याचा ठरावावर सभेत होणार चर्चा

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


केवळ १७ कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी ३०० कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या कारखान्यावर जप्तीची कारवाई करून तो भाडेकराराने खाजगी कारखान्याला देण्याचा निर्णय आदिनाथ च्या सभासदांना रुचलेला नव्हता. याला तालुक्यातून प्रचंड विरोध करत आदिनाथ बचाव समितीची निर्मिती झाली. यातून पुढे आलेल्या मागणी पोटी आदिनाथचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी रविवारी आदिनाथ ची सर्वसाधारण सभा बोलवली असून ही सभा ऑनलाईन होणार आहे. एस वी च्या नोटिसा सभासदांना पोच करण्याचे काम वेगाने सुरू आहेत.
आदिनाथ साखर कारखान्याचा भाडे करार बारामती ॲग्रो कंपनीबरोबर करण्यात आला होता. मात्र संबंधित कंपनीने जाणीवपूर्वक कारखाना सुरू केला नाही, असा आरोप सभासदांमधून झाला आहे. सलग दोन वर्ष आदिनाथ बंद असल्यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड हाल झाले असून ऊस बांधावर फेकून देण्याची किंवा पेटून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. या अतिरिक्त उसाचा फायदा घेत खासगी कारखान्यांनी करमाळा तालुक्यातील ऊस कवडीमोल भावाने घेतला आहे. शिवाय ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांना एकरी १० ते १५ हजार रुपये खर्च आला आहे. यामुळे शेतकरी वर्गातून प्रचंड संतापाची लाट निर्माण झाली असून नुकतेच बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आदिनाथ च्या सर्वेसर्वा रश्मी बागल यांची भेट घेऊन या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली होती. याची दखल घेऊनच ही तातडीची सर्वसाधारण सभा घेण्यात येत आहे.
या सभेत काही सूचना आपले प्रश्न मांडायचे असतील तर ते १७ मार्च सायंकाळी पाच वाजण्याच्या पूर्वी कारखाना स्थळावर पाठवावेत किंवा कारखान्याच्या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात. तसेच सभेत सहभागी होणार्यांनी ऑनलाईन नोंदणी कारखान्याकडे करावी. अशी विनंती कारखान्याचे कार्यकारी संचालक बागनवर यांनी केली आहे.
या सभेत विषय क्रमांक ०९ व विषय क्रमांक १० नुसार आदिनाथ चा भाडेकरार ठराव रद्द करणे व उर्वरित कर्ज राज्य शिखर बँकेने कर्ज पुनर्गठन करून घेणे हे महत्त्वाचे दोन ठराव घेण्यात आले असून या ठरावावर आता कारखान्याचे मूळ मालक असलेले ३०००० सभासद काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
ही बैठक ऑनलाइन असली तरी आदिनाथ कारखान्याच्या सर्व सभासदांनी रविवारी २० मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता कारखान्याच्या कार्यस्थळावर हजर रहावे. तेथे स्क्रीनची व्यवस्था करून प्रत्येकाला ऑनलाईन सभेत सहभागी करून घेण्याचे नियोजन केले असल्याची माहिती बचाव समितीचे निमंत्रक हरिदास डांगे यांनी दिली आहे.



