BREAKING: जनशक्तीचे रास्तारोको आंदोलन स्थगित; ‘या’ कारणामुळे पोलिसांनी नाकारली परवानगी
प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे


करमाळा तालुक्यातील शेती पंपाची वीज तोडल्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच संतापला आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास या अचानक केलेल्या वीज कपातीमुळे जळून जात आहे. याच पार्श्वभूमीवर जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी या विजकपाती विरोधात शेलगाव चौक येथे करमाळा – टेंभुर्णी महामार्गावर मंगळवार दिनांक ०१ मार्च रोजी सकाळी ११:०० वाजता रास्तारोको आंदोलन करण्याची घोषणा केली होती.
मात्र, या प्रकरणी पोलिसांनी एक नोटीस जारी करून सदर रास्तारोको आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे आंदोलन दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्याची घोषणा खूपसे पाटील यांनी केली आहे.
यावेळी बोलताना अतुल खूपसे म्हणाले की, मी पोलिस प्रशासनाचा सन्मान करतो, संविधानाला मानतो. उद्या महाशिवरात्र आहे. त्यात संगोबाची यात्रा आहे. त्यामुळे त्याठिकाणी पोलिसांना बंदोबस्ताला जावे लागणार आहे. माझे पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं असून आपण हे आंदोलन उद्या न करता, येत्या दोन दिवसात करणार आहे. पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, त्यांच्यावर यात्रेचा तणाव आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसात परवानगी घेऊन हे रास्तारोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. असे मत अतुल खूपसे पाटील यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.
या आंदोलनाला शेतकऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती.



