प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपजिल्हा रुग्णालय करमाळा या रुग्णालयांमध्ये २० खाटांचे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात यावा अशी आग्रही मागणी १२ जानेवारी २०२२ रोजी लेखी पत्राद्वारे आपण राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांच्याकडे केली होती. सदर मागणी त्यांनी मान्य केली असून शासन अध्यादेशाद्वारे करमाळा उपजिल्हा रुग्णालयात लवकरच २० खाटांचे दक्षता विभाग सुरू होईल अशी माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा हे शहर विजापूर – टेंभुर्णी – अहमदनगर- दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील गाव असून पंढरपूर, अहमदनगर, शिर्डी येथे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे. करमाळा शहराची लोकसंख्या ३० हजारांपेक्षा जास्त असून उजनी धरण, औद्योगिक वसाहत, कारखानदारी व बागायती क्षेत्र असल्यामुळे लोकसंख्यावाढीचा वेग मोठा आहे. परंतु याठिकाणी आरोग्य सुविधा अत्यंत कमी असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे करमाळा येथील रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यात यावा यासाठी आपण प्रयत्नशील होतो. सदर मागणी तीन आठवड्यातच मंजूर झाली असल्यामुळे करमाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम होण्यास मदत होणार आहे.




