करमाळा तालुक्याला १४ दिवस मिळणार कुकडीचे पाणी; आ. संजयमामा शिंदे यांची माहिती
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


कुकडी प्रकल्पाचे रब्बी आवर्तन सुरू झाले असून हे पाणी करमाळा तालुक्यांमध्ये ०५ जानेवारीला पोहोचले आहे. हे आवर्तन टेल टू हेड पद्धतीने चालणार असून करमाळा तालुक्याला ०५ जानेवारी ते १८ जानेवारी पर्यंत असे एकूण १४ दिवस हे पाणी मिळणार असल्याची माहिती तालुक्याचे आमदार मा. संजयमामा शिंदे यांनी दिली.
दि. ०७ ते १२ जानेवारी यादरम्यान कुकडीचे पाणी करमाळा तालुक्यातील झरे, वीट, वंजारवाडी, रावगाव, मोरवड, पिंपळवाडी, कुंभारगाव, घरतवाडी, सावडी, कोर्टी, राजुरी या गावांना मिळणार असून दिनांक १४ ते १८ जानेवारी असे ०५ दिवस हे पाणी जातेगाव, कामोणे या गावांना मिळणार आहे. या पाण्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
दहा वर्षानंतर मिळाले राजुरीला पाणी
राजुरी येथील तलावाला चिलवडी शाखा कालवा कोर्टी वितरिका मधून तब्बल १० वर्षानंतर समाधानकारक पाणी मिळाले असून या पाण्यामुळे रब्बी पिकांबरोबरच उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. या पाण्यामुळे राजुरीतील ५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. हे पाणी राजुरीला उपलब्ध करून देण्यासाठी आ.संजयमामा शिंदे प्रयत्नशील होते. त्याचबरोबर राजूरी येथील आर आर बापू साखरे, महादेव दुरंदे, नंदकुमार जगताप आदींनी आ. संजयमामा शिंदे यांचेकडे पाठपुरावा केला होता.
डॉ. अमोल दुरंदे
तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्यामुळे राजूरी येथील शेतकरी वर्ग आमदार शिंदे यांचे आभार व्यक्त करत आहे.



