माय मराठी न्युज नेटवर्क


आदरणीय ,
भारतीय जनता आणि माझे हितचिंतक मित्र आणि आप्तेष्ट, आज दिनांक २६/०७/२०२१ वार सोमवार सकाळी झोपेतून उठल्यावर नेहमी प्रमाणे मोबाइल हातात घेउन पाहिले असता कारगिल दिवसाच्या शुभेच्यांचा वर्षाव करणारे मेसेज आले होते. तेव्हा आपण आर्मी मध्ये होतो याची तीव्र जाणीव झाली. आणि दुसरा मेसेज “Happy birthday” माझा एक मित्र (माजी सैनिक) याचे कडून आला. कारण कारगिल लढाईत आमचा पुनर्जन्मच झाला होता. २७/०७ ला दरवर्षी एकमेकांना शुभेच्छा देत असतात. काही काळ फक्त मेसेज पाहत राहिलो आणि २२ वर्षं पाठीमागे गेलो. विचारात मग्न होऊन थेट कारगिल युद्ध भूमीवर आपल्या सवंगड्या सोबत १९९९ सालीचे कारगिल युद्धाचे विदारक क्षण आठवले.

तो कुटुंबा पासून दूर होत असल्याचा वियोग, त्याग, ते देश प्रेम, सैनिकांचे मनोबल आणि आपसात असलेले कॉम्बिनेशन आठवले. लढाई च्या काळात खूप हाल झाले होते. कधी कधी वाटत असे की, आपण आता परत घरी जातो की नाही. दुश्मनांच्या तोफा डोक्या वरून जात होत्या. MMG, LMG च्या गोळ्या जवळून जात होत्या. सिनेमा पाहताना दृश्य, संवाद पडद्यावर जसे ठराविक वेळेत नजरे समोरून निघून जातात तशा आठवणी हृदयाच्या दृष्टी पटला वरून निघून जात होत्या.

खरच १९९९ साली झालेल्या कारगिल लढाई मध्ये शाहिद झालेल्या सर्व माझे सोबतचे सैनिक अधिकारी आणि जवान याना माझा मानाचा मुजरा आणि कारगिल विजय दिवस निमित्त भावपूर्ण 🇮🇳श्रद्धांजली. मी स्वतः कारगिल लढाई मध्ये ७० इन्फट्री ब्रिगेड सिग्नल कंपनी या युनिट मधून सक्रिय भाग घेतला आहे. तसेच १/११ Gorkha regiment या बटालियन सोबत कारगिल युद्धात मला देश सेवा करण्याची संधी मिळाली होती. लढाई दरम्यान पाकिस्तान सीमेवरील खालशी, दाह, घणासक, यालदोर batalic सेक्टर, बोल्डर्स एरिया, अश्या दुर्गम ठिकाणी captain अमोल कालिया, कॅप्टन मनोज पांडे अश्या निधडया छातीच्या, शेर दिल, परमवीर चक्र विजेते, देशप्रेमी, तडफदार, तरुण अधिकारी यांचे सोबत खांद्याला खांदा देऊन लढाई करण्याचा योग मला मिळाला. तसेच परमवीर चक्र विजेते फक्त २४ वर्ष वयाचे कॅप्टन मनोज पांडे युद्धात धारातीर्थी पडल्यावर त्यांचे पार्थिव बॉम्ब वर्षाव होत असताना युद्ध भूमीतून बेस कॅम्प कडे, जेथे हेलिपॅड बनवले होते. त्या सुरक्षित स्थळी पोहोचवतांना खांद्यावर घेऊन जाण्याचा सन्मान मला मिलाला आहे. मी धन्य झालो होतो. समुद्र सपाटी पासून १८००० फूट उंचीवर मे महिन्यात ही बर्फ असलेल्या प्रदेशात प्रतिकूल परिस्तिथी मध्ये जीवाची पर्वा न करता, घरची परिस्थिती हालाकीची असून सुद्धा त्यांची फिकीर न करता भारत मातेची शान राखण्यासाठी जीवाची पर्वा न करता लढाईत प्राण झोकून दिले होते.

त्या सर्व सैनिकांच्या बलिदानाचे परिणाम आज देशभरात आनंदोत्सव साजरा करताना दिसतात. ते दिवस आठवल्यावर मन गहिवरून येते. युद्धात बरेच साथीदार शाहिद झाले त्यांना मनापासून श्रद्धांजली. अश्या त्या अशांत परिस्थिती मध्ये ही माझ्या जवळच्या कॅमेरात काही सुंदर, हळवी आणी विदारक क्षणचित्रं मी माझ्या फोटोग्राफीच्या शौकमुळे कॅमेऱ्यात कैद केले होते. आजतागायत…आज मन भरून आले शूर सैनिकांची आठवण आली. लढाईत सोबत असलेल्या सर्व माझे सर्व्हिस मध्ये असलेली तसेच निवृत्त झालेल्या जिवलग मित्र आणि अधिकारी वर्ग यांना अभिवादन आणि सलाम.
बजरंग चौगुले
सहाय्यक पोलीस निरीक्षक, नाशिक ग्रामीण
(माजी सैनिक, करमाळा, सोलापूर)
भारत देशाची सेवा करुन, कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याशी लढून कारगिलवर तिरंगा ध्वज फडकवला. असे खरे हिरो मेजर बजरंगजी चौगुले हे करमाळ्याच्या भूमीत जन्मले. हे करमाळा तालुका वासीयांचे खरोखरच भाग्य आहे. या रियल हिरो ला नतमस्तक होऊन मानाचा मुजरा.
प्रवीण अवचर (गायक) मांगी




