शेती वीजपुरवठा सुरू करा अन्यथा मोर्चा काढणार; यांनी दिला महावितरणला इशारा
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील शेतकऱ्यांना दिनांक १५ नोव्हेंबर रोजी वीज वितरण कंपनीने कोणतीही पूर्वसुचना न देता शेतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. गेल्या पाच दिवसांपासून केम व परिसरातील शेतकरी अंधारात आहेत. खंडित केलेला वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे आठ तास करा अन्यथा केम येथील महावितरण कार्यालयावर शेतकऱ्याना सोबत घेऊन मोर्चा काढणार आहे. असे निवेदन ए पी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अच्युत काका पाटील यांनी महावितरण कार्यालय केमला दिले.
केम येथील खंडित विजेमुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. गेली पाच दिवस झाले शेतकरी अंधारात आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. विहिरीतुन उपसावे लागत आहे. यामुळे वाड्यावस्त्या वरील शेतकरी, महिला यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकरी वर्गाची पीके जळायला लागली आहेत. सध्या ज्वारी, ऊस, तुर असून या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, विजेअभावी पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने पिके जळून चालली आहेत. अगोदरच कोरोना मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असताना आता वीजेअभावी नुकसान होऊ नये.
माढा तालुक्यात शेतीसाठी वीज आहे पण करमाळ्यात नाही हा दुजाभाव का.? करमाळ्यातील शेतकऱ्यांनी अन्याय का सहन करायचा.? असा संतप्त सवाल अच्युत काका पाटील यांनी केला. तरी राज्य शासनाकडून वारंवार वीज खंडित करणे हे म्हणजे चेष्टाच असुन शेतकरयांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.
येत्या दोन दिवसात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा पूर्ववत आठ तास करावा, अन्यथा केम महावितरण कार्यालयावर मोठे आंदोलन छेडले जाईल. यावेळी होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी ही शासनाची असणार आहे.
अच्युत काका पाटील ए.पी. ग्रुप संस्थापक अध्यक्ष
यावेळी अच्युत काका पाटील, महावीर आबा तळेकर, संदिप तळेकर, सागरराज तळेकर, वसंत सर, बापूराव नेते तळेकर, दत्ता गोसावी, पिनु तळेकर, मोहन काळे आदि शेतकरी उपस्थित होते.



