प्रतिनिधी


प्रत्येक शहराच्या मुख्य ठिकाणी हजारो कोटी रुपये किमतीची साडे सोळाशे एकर जमीन एस. टी. च्या मालकीची आहे. एस टी २०० लिटरचे ऑईल बॅरेल मागवते. मात्र, त्यामध्ये १९० लिटर ऑईल असते आणि रक्कम मात्र २०० लिटरची अदा केली जाते. एस टी च्या चालू कामासाठी न लागणारे स्पेअरपार्ट मागवले जातात. तेही डुप्लिकेट व बिल मात्र, ओरिजनल पार्टचे अदा केले जाते. पूर्वी ट्रिमॅक्स कंपनीचे तिकीट मशीन वापरत असताना प्रति तिकीट २६ पैसे कमिशन कंपनीला दिले जात होते व त्यावेळी कंपनी रोल पुरवठा करत होती. परंतु, आता रोल एस. टी. च्या मालकीचे असताना ट्रिमॅक्स कंपनीला प्रति तिकीट ३६ पैसे कमिशन दिले जाते. अशा वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःची घरे भरली जातात. म्हणूनच, एस टीचे विलीनीकरण केले जात नाही. असा घणाघात जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांनी केला आहे.
एस टीच्या विलीनीकरणासाठी मुंबई येथील आझाद मैदानासह राज्यभर एस टी विलीनीकरणाचा लढा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे सुरू असलेल्या लढ्याला जनशक्ती संघटनेने पाठिंबा दर्शवला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना खूपसे म्हणाले की, प्रवाशाने तिकीट नाही काढलं तर वाहकावर कारवाई केली जाते. १००, २००, ३०० पट दंड आकारण्यात येतो. पण, प्रवाशाला काहीही केले जात नाही. डेपोमध्ये काही लोकांना अधिकारी पैसे घेवून चांगली ड्युटी लावतात. सध्या वापरात असलेल्या गाड्या या चौदा वर्ष जुन्या आहेत, त्यामुळे सध्या एकही गाडी सुस्थितीत नाही. नवीन गाड्यांची खरेदी नाही. सदर गाड्या आरटीओ च्या नियमानुसार नाहीत. तरीसुद्धा अशा गाड्या घेवून जाण्याची सक्ती चालकावर केली जाते, अन्यथा कारवाई केली जाते. आणि तशी गाडी घेवून गेले तर बाहेर आरटीओ कारवाई करते. बदलीसाठी, बढतीसाठी पैशाची मागणी केली जाते. अनेकवेळा प्रशासन वैयक्तिक पातळीवर कारवाई करते व ते प्रकरण पैसे घेवून मिटवले जाते. करार संपलेल्या व एक्सपायार झालेल्या व नादुरस्त तिकीट मशीन वाहकास दिल्या जातात व त्याची वसुली व कारवाई वाहकावर केली जाते. 3 वर्षे झाले कर्मचाऱ्यांना गणवेश साठी कापड दिले गेले नाही. पूर्वी वर्षातून दोन वेळा असे कापड दिले जायचे, तसा नियम आहे. अशाप्रकारे तोंड दाबून बुक्क्याचा मार हा एसटी कर्मचारी सहन करत आहे. त्यामुळे एसटी चे विलीनीकरण राज्य शासनामध्ये झालेच पाहिजे. जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या खांद्याला खांदा लावून लढ्यामध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
एसटी खात्यामध्ये देखील ‘वाझे’ आहे काय..??
– माधव काळे नावाचा अधिकारी दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाला आहे. मात्र, तरीही त्याला या सरकारने महाव्यवस्थापक पदी निवड केली आहे. निवृत्त अधिकाऱ्याला अशी भरती कशासाठी दिली हे न समजण्याइतके प्रकरण नव्हे. त्यामुळे एसटी खात्यात देखील वसुलीसाठी सचिन वाझे याप्रमाणे ‘काय’ नावाचा अधिकारी आहे असे स्पष्ट मत अतुल खूपसे पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी जनशक्ती संघटना युवक जिल्हाअध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, तालुका अध्यक्ष महेश मस्के, तालुका युवक अध्यक्ष गणेश ढोबळे, रोहन नाईकनवरे, राहुल वाघे, राजाभाऊ धायगुडे, राजू कणसे, विठ्ठल कानगुडे, जोतिराम ढोबळे आदी एस टी कर्मचारी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.




