प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


राज्याच्या मंत्रिमंडळात प्राध्यापक तानाजीराव सावंत यांचा कॅबिनेट मंत्रीपदी शपथविधी झाल्यानंतर शिवसैनिकांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद प्रा. तानाजीराव सावंत यांच्याकडे द्यावी अशी मागणी करमाळ्यातील शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी केली.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहर प्रमुख संजय आप्पा शीलवंत, उपशहर प्रमुख नागेश गुरव, राजेंद्र काळे, मारुती भोसले, नागेश शेंडगे, युवा सेनेचे मावलकर, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर, संजय जगताप, राजेंद्र मिरगळ यांनी आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे म्हणाले की, गेली अडीच वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सत्तेचा वापर स्वतःच्या कुटुंबासाठी व स्वार्थासाठी केला होता. आता खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचे सरकार आले असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रकल्प व रखडलेले प्रश्न मार्गी लागतील. प्रा. तानाजीराव सावंत यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाल्यामुळे एक सक्षम व धडाकेबाज निर्णय घेणारा मंत्री सोलापूर जिल्ह्याला मिळणार असून करमाळा तालुक्यातील दहीगाव उपसा सिंचन योजना, कुकडीची उर्वरित कामे तसेच रस्त्याची अधिक कामे मार्गी लागतील. असा विश्वास यावेळी उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केला.




