प्रवास गड-किल्ल्यांचा, ध्यास दुर्ग संवर्धनाचा : आड किल्ला
आड किल्ला


नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ही यादवांची पहिली राजधानी होती. त्यामुळे सिन्नर जवळ आड, डुबेरगड या किल्ल्यांची निर्मिती झाली असावी. सिन्नर या एकेकाळच्या राजधानीकडे येणार्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असावा. आड किल्ल्यावरुन एका बाजूला डुबेरगड, सिन्नर व दुसर्या बाजूला आड, पट्टा आणि औंधा (अवंधा) पर्यंतचा प्रदेश दिसतो.
आड किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. दक्षिण बाजूला किल्ल्याच्या डोंगराजवळ एक छोटा डोंगर आहे. आडवाडीतून आड किल्ल्याकडे जाणार्या वाटेवर मातीचे धरण आहे. या धरणाच्या बाजूने शेतातून वाट किल्ल्याच्या पायथ्याच्या हनुमान मंदिरा पर्यंत जाते. या कौलारु हनुमान मंदिरात हनुमानाची मुर्ती, पिंड आणि २ वीरगळी आहेत. हनुमान मंदिर किल्ल्याच्या उत्तर टोकाच्या पायथ्याशी आहे. हनुमान मंदिरापासून एक पायवाट किल्ल्याच्या डोंगराच्या मध्य भागातून डोंगराच्या पाऊण उंचीवर असलेल्या कातळातील गुहेपाशी जाते. हनुमान मंदिरापासून गुहे पर्यंत पोहोचण्यास १० मिनिटे लागतात. या ठिकाणी नैसर्गिक गुहा आहे. गुहेत एक बाक आणि गुहेच्या बाहेर पाण्याचे टाक कोरलेले आहे. ते टाक सध्या कोरडेच आहे. गुहेत आडूबाईचे ठाण आहे. येथे काही नव्या जुन्या मुर्ती आहेत.
गुहेत थोडावेळ आराम करुन किल्ल्याच्या उत्तरेकडील डोंगरधारेकडे चालायला सुरुवात करावी. ५ मिनिटात आपण डोंगर धारेवर पोहोचतो. याठीकाणी कातळात कोरलेल्या १० पायर्या आहेत. या पायर्यांवरुन जपून चढावे लागते. पायर्या चढून गेल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. गडमाथ्यावर समोरच एक बुजलेले पाण्याचे टाक आहे. त्याच्या थोडे पुढे एकमेकांना काटकोनात असलेली दोन पाण्याची मोठी टाकी आहेत. या टाक्यांच्या डाव्या बाजूला ५ टाक्यांचा समुह आहे. या सर्व टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या टाक्यांच्या पुढे गडावरील उंचवटा आहे. पण त्या उंचवट्याकडे न जाता डाव्या बाजूने किल्ल्याच्या कडेकडेने प्रदक्षिणा चालू करावी.
गड प्रदक्षिणेत प्रथम एक कोरडा तलाव दिसतो. पुढे कड्यावर वास्तूचे अवशेष दिसतात. त्यापुढे एक कोरडे पाण्याचे टाके आहे. पुढे १५ मिनिटे चालत जाऊन वळसा मारल्यावर आपण किल्ल्याच्या मागिल बाजूस येतो. याठिकाणी एक पडकी वास्तू आहे. तिच्या भिंती कशाबशा तग धरुन उभ्या आहेत. या वास्तूच्या पुढे पाच टाक्यांचा एक समुह आहे. यातील पाणी पिण्यायोग्य नाही. टाकी पाहून झाल्यावर मध्यभागी असलेल्या उंचवट्यावर चढून जावे. याठिकाणी २ वीरगळी आहेत. माथ्यावर वास्तूंचे चौथरे आहेत. ते सर्व पाहून परत टाक्यांपाशी उतरावे आणि पुढे चालायला सुरुवात करावी. मधल्या टेकाडाला वळसा घातल्यावर कड्या जवळ असणार्या एका खाचेत किल्ल्याचा उध्वस्त प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दार वरुन चटकन नजरेस पडत नाही त्यासाठी थोडे खाली उतरुन जावे लागते. प्रवेशव्दाराच्या दरवाजीची कमान तुटलेली आहे. बाजूचे बुरुज ढासळलेले आहेत. दरवाजातून खाली उतरणारी वाट मोडलेली आहे. त्यामुळे या वाटेने खाली उतरता येत नाही.
किल्ल्याचे प्रवेशव्दार पाहून पुन्हा वर येऊन गड प्रदक्षिणा चालू करावी. ५ मिनिटात आपण एका कोरड्या टाक्यापाशी पोहोचतो. हे टाक पाहून पुढे गेल्यावर आपण काटकोनात असलेल्या दोन टक्यांपाशी पोहोचतो. येथे आपली गड प्रदक्षिणा पूर्ण होते. गडफ़ेरी पूर्ण करण्यास एक तास लागतो.
आड किल्ल्यावरुन पश्चिमेला अवंधा (औंधा), पट्टा, बितनगड आणि त्यामागे कलसूबाईचे शिखर दिसते. तर ईशान्येला डुबेरगड (डुबेरा) दिसतो.




