मोठी दुर्घटना: दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू
माय मराठी न्युज


दुर्गा चाळ, गोलाई नगर, चर्च रोड, कळवा पूर्व येथे भूस्खलन झाले आहे. यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुर्घटनास्थळी आरडीएमसी, टीडीआरएफ टीम आणि अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे. यात १ रेस्क्यू वाहन, १ अग्निशामक गाडी, २ रुग्णवाहिकेचा समावेश आहे.
प्रभू सुदाम यादव ( वय ४५ वर्षे ), विद्धवतीदेवी प्रभू यादव ( वय ४० वर्षे ), रवीकिशन यादव ( वय १२ वर्षे ), सीमरन यादव ( वय १० वर्षे ), संध्या यादव ( वय ३ वर्षे ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर प्रिती यादव (वय ५ वर्षे) व आचल यादव (वय १८ वर्षे ) अशी जखमींची नावे आहेत.
नेमकं काय घडलं..?
मुंबईसह ठाणे जिल्ह्यात पाऊस वैरी होऊन कोसळतोय. या मुसळधार पावसाने गेल्या 48 तासात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अनेकांचा बळी घेतला आहे. चेंबूरमध्ये घरांवर दरड कोसळल्याची घटना ताजी असताना अगदी तशाच घटनेची पुनरावृत्ती ठाण्याच्या कळवा शहरात झाली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरावर दरड कोसळल्याने अचानक मोठा आवाज आला. हा आवाज ऐकल्यानंतर आजूबाजूचे नागरिक घराबाहेर आले. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. एका घरावर दरड कोसळल्याने ते घर नेस्ताबूत झालं होतं.
मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर
या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच, जखमींवरही मोफत उपचार केले जाणार असल्याचे एकनाथ शिंदें यांनी सांगितले आहे. जखमींवर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच डोंगरावर राहणाऱ्या कुटुंबियांचे स्थलांतर करण्याचे ही आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत.©




