
सांगोला/प्रतिनिधी


सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावची ग्रामपंचायत निवडणूक हे सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे. कारण काय झाडी, काय डोंगार, काय हाटील या डायलॉगने प्रसिध्दीस आलेले शिंदे गटाचे आम. शहाजीबापू पाटील यांना ठाकरे गटाचा मावळा युवासेना तालुकाध्यक्ष सुभाष भोसले यांनी कडवे आव्हान उभे केल्याने आम. शहाजी पाटील यांची होमपिचवरच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या स्वतःच्या चिकमहुद या गावची ग्रामपंचायत निवडणुक सध्या चुरशीची झाली आहे. सरपंच पदासाठी आमदार शहाजीबापू यांचे सख्खे मेव्हणे सुरेश कदम यांच्या पत्नी शोभा कदम निवडणूक लढवीत आहेत. तर त्यांच्या विरोधात युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले यांच्या पत्नी सुप्रिया भोसले यांनी कडवे आवाहन उभे केले आहे. त्यासाठी शेकापने मदतीचा हात दिल्याने शिंदे समर्थक आमदार शहाजी पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आजपर्यंत शहाजीबापू पाटील यांचे या ग्रामपंचायत वर एकहाती वर्चस्व राहिले आहे. यावेळेस मात्र युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले यांनी प्रस्थापितांविरुद्ध तरुणाई एकत्र करून शेकापचा देखील पाठिंबा मिळवल्याने एकनाथ शिंदे शिवसेना, अजीत पवार यांची राष्ट्रवादी व भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून आमदार शहाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला तगडे आव्हान दिले आहे. शहाजी पाटील यांच्या घरातील उमेदवार सरपंच पदासाठी लढत असल्याने स्वतः आमदार शहाजी पाटील हे गावात तळ ठोकून आहेत.
त्याचरोबरच युवासेना तालुकाप्रमुख सुभाष भोसले यांनी चिकमहुद येथे युवासेनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत, शालेय साहित्य वाटप, विद्यार्थी, महिला युवांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केल्याने ते घराघरापर्यंत पोहचले आहेत. टंचाईच्या कालावधीत संपुर्ण गावात स्वखर्चाने टॅंकर ने पाणीपुरवठा केल्याने त्यांनी नागरिकांची मने जिंकली आहेत. शहाजी पाटील हे मिंधे गटात गेल्यानंतर प्रचंड दबाव असताना देखील सुभाष भोसले हे ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्याने सुभाष भोसले यांच्या विषयी ग्रामस्थांची वेगळीच सहानभुती भोसले यांना मिळाली आहे. पैसा दहशत, दबाव याचा वापर करून सर्वसामान्य जनतेला गृहीत धरणाऱ्या प्रस्थापितांना यावेळेस चांगलाच धडा शिकवायचा असा निर्धार चिकमहुद येथील महिला, युवक यांनी केल्याची चर्चा परिसरातून होत आहे.
ग्रा. पं. निवडणुकीच्या टेन्शन मुळे शहाजी पाटील यांची दसरा मेळाव्याकडे पाठ!
स्टेजवरून मोठमोठी भाषणे करण्यात पटाईत असलेले आम. शहाजी पाटील हे युवासेनेकडुन देण्यात आलेल्या आव्हानामुळे गावच्या निवडणुकीच्या टेन्शन मध्ये असल्याने मुंबईला झालेल्या दसरा मेळाव्यास फिरकले नाहीत. यावरूनच या निवडणुकीतील आमदाराची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे स्पष्ट दिसून येते.




