
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


मागील आठवड्यात बांगलादेशमध्ये इस्लामिक जमावाकडून दिपू चंद्रदास या निरपराध हिंदू तरुणाची धार्मिकतेच्या नावाखाली जिवंत जाळून निर्घृण हत्या करण्यात आली. या अमानवी व क्रूर घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली असून विविध ठिकाणी निषेध आंदोलन व मोर्चांचे आयोजन करण्यात येत आहे.
बांगलादेशमध्ये सातत्याने हिंदू समाजावर अत्याचार, हत्या व धार्मिक छळ होत असल्याच्या घटना समोर येत असून, धार्मिकतेच्या आडून हिंदू समाजाला संपविण्याची सुनियोजित कुटनीती राबवली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सकल हिंदू समाज करमाळा यांच्या कडून शुक्रवार दि. २६ डिसेंबर रोजी करमाळा शहरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
हा मोर्चा करमाळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते सुभाष चौक या मार्गावरून काढण्यात आला. मोर्चादरम्यान “बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवा”, “हिंदूंवरील हत्यांचा निषेध असो”, “भारत सरकारने ठोस भूमिका घ्यावी” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच या घटनेची गंभीर दखल घेऊन भारत सरकार व प्रशासनाने बांगलादेश सरकारवर दबाव आणावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या मोर्चात विश्व हिंदू परिषद सोलापूर विभागाचे विभाग संयोजक ऋषिकेशजी चव्हाण, पंढरपूर जिल्हा सहसंयोजक लिंगेश्वर तकटे, करमाळा प्रखंड प्रमुख स्वप्निल चव्हाण, सुरक्षा प्रमुख ऋषिकेश महामुनी, गोरक्ष प्रमुख लक्ष्मण साखरे यांच्यासह भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, दिपक चव्हाण, रामभाऊ ढाणे, सचिन गायकवाड, अफसर तात्या जाधव, सुहास घोलप, संताजी घोरपडे, संकेत दयाळ, धनु हलवाई, अमोल राऊत तसेच बजरंग दलाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




