अन्न धान्य पुरवठा विभागाचा निर्णय; ‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द
माय मराठी न्यूज नेटवर्क

गरजूंच्या दोन वेळच्या अन्नाची सोय व्हावी, या उद्देशाने रेशन कार्डवर स्वस्त दरात दर महिना धान्य उपलब्ध करुन दिलं जातं. प्रत्यक्षात अनेक कार्डधारक या सवलतीचा लाभच घेत नसल्याचं आढळलं आहे. मागील अनेक वर्षांपासून जे लाभार्थी स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेत नाहीत असे रेशनकार्डच रद्द करण्याचा निर्णय अहमदनगर पुरवठा विभागाने घेतला आहे. देशभरात बोगस रेशनकार्ड काढणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. तर कार्ड सक्रिय न ठेवण्याचे प्रमाणही राज्यात जास्त आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने अशा रेशनकार्ड धारकांना आपला लाभ सोडण्याचे आवाहन केले होतं.
दरम्यान जिल्हा पुरवठा विभागाने अशा रेशनकार्ड धारकांची यादी बनवून हे रेशनकार्ड NPH मध्ये वर्गीकरण करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना केल्या आहेत. जेणेकरुन खऱ्या लाभार्थ्यांना रेशनकार्डचा लाभ मिळेल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली. मागील सहा महिन्यांत ज्यांनी धान्य घेतले नाही, असे कार्ड रद्द करण्याची मोहीम प्रत्येक महिन्याला सुरुच असते. जिल्ह्यात धान्य न घेणाऱ्यांची संख्या जवळपास पंधरा हजारांवर असण्याची शक्यता जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कार्ड असले तरी अनेक नागरिक धान्य घेत नाहीत, अशांची माहिती जसजशी समोर येईल, तसतसे रेशनकार्ड रद्द करण्याची कार्यवाही होईल, असंही पुरवठा अधिकारी माळी यांनी सांगितलं आहे.
केंद्र सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड योजनेअंतर्गत मेरा रेशन ॲप लॉन्च केलं आहे. या ॲपच्या मदतीने रेशन कार्डासंबंधीची अनेक कामं केली जाऊ शकतात. रेशन कार्डधारकांना पीडीएसच्या मदतीने धान्य मिळते. अर्थात नागरिक जेव्हा दुसऱ्या राज्यात नोकरी किंवा रोजगारासाठी जातात तेव्हा त्यांना यात थोडीशी अडचण येते. या प्रकारच्या आणि इतर अनेक अडचणींना दूर करण्यासाठी मेरा रेशन ॲप लॉन्च करण्यात आले आहे. हे ॲप हिंदी आणि इंग्रजीसह दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबरच्या मदतीने या सुविधेचा लाभ घेता येतो. रेशन कार्डधारकांना कोणकोणत्या वस्तू मिळत आहेत याची माहिती इथे मिळेल.




