प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


महाराष्ट्र शासन व पुणे प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा प्रथमच पेरणे फाटा येथील विजयस्तंभावर शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून आलेल्या अनुयायांनी शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना दिली. तसेच प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. भीम सैनिकांना विशेषतः महिला व वृद्ध नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने सर्वांनी महाराष्ट्र शासन व पुणे प्रशासकीय विभागाचे विशेष आभार मानले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने लावण्यात आलेले कोरोनाचे नियम पाळत मानवंदना दिली.
शौर्यदिनाचे निमित्ताने मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्राच्या बरोबर देशभरातील लाखो भीम सैनिक मानवंदना देण्यासाठी विजयस्तंभावर येत असतात. कोरोनाच्या लाटेनंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर पेरणे फाटा येथे शौर्य दिन शासनाच्या वतीने साजरा करण्यात आला. यासाठी मागील अनेक दिवसांपासून पंचक्रोशीतील गावांमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, फायर ब्रिगेड आदी महत्वाच्या अधिकाऱ्यांनी बैठका घेण्यात आल्या होत्या. यामुळे परिसरातील दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांनी आपली दुकाने उघडी ठेवत प्रशासनाला सहकार्य केले.
पेरणे फाटा येथील विजयस्तंभावर रात्री बरोबर १२ वाजता फटाक्यांची आतिषबाजी करत सलामी देण्यात आली. बौद्ध वंदना, शौर्यपाठ आदी कार्यक्रम यावेळी रात्री घेण्यात आले. तर सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने परेड घेण्यात आली. शौर्यदिनाचे निमित्ताने दरवर्षी प्रमाणे याही वेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटे विजयस्तंभास मानवंदना देत सर्व भीम सैनिकांनी कोरोनाचे नियम पाळत मानवंदना देण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर दिवसभर आनंद शिंदे, प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, ऊर्जामंत्री नितीन राऊत, भीमराव आंबेडकर, चंद्रकांत हंडोरे, खासदार रामदास आठवले, बापूसाहेब भोसले, चंद्रशेखर आझाद, सीताराम गंगावणे, सर्जेराव वाघमारे, राहुल डंबाळे, विवेक चव्हाण आदींनी विजयस्तंभावर येऊन मानवंदना दिली.
शौर्यदिनाचे निमित्ताने विजयस्तंभाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या लोकांसाठी शासनाच्या वतीने ५० हजार मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी विजयस्तंभाच्या बाजूला असणारे पुस्तकांची दुकाने यंदा गर्दी टाळण्यासाठी काही अंतरावर ठेवण्यात आल्याने येणाऱ्या भीम सैनिकांना व्यवस्थित व अंतर ठेवून मानवंदना देता आली. तसेच या भागात शासनाच्या वतीने आरोग्य सुविधा, मोबाईल टॉयलेट, पिण्याचे शुद्ध पाणी, मास्क आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच येणाऱ्या अनुयांयांना शिक्रापूर ते कोरेगाव भीमा व वाघोली ते नवीन टोलनाका या ठिकाणी मोफत पीएमपीएमल च्या बसेस ठेवण्यात आल्या होत्या.




