प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


ग्रामीण भागातील तरुण विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरकडे गांभीर्याने पाहावे व शेतीबरोबर नोकरी व उद्योग व्यवसायात आपले आयुष्य घडवावे. असे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. करमाळा तालुक्यातील केतूर येथील नेताजी सुभाष विद्यालयात कै. निर्मला विनायक कोकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोकरे परिवार पणदरे (ता. बारामती) व पाटील परिवार केत्तुर (ता. करमाळा) यांनी बांधलेल्या अद्ययावत अभ्यासिकेच्या लोकाअर्पण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे हे होते.

याप्रसंगी अधिक बोलताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शाळेच्या विकासासाठी तसेच शाळेच्या क्रीडांगण तसेच इमारतीसाठी ५० लाख रुपयांचा निधी देऊ असे आश्वासन दिले. तसेच बालकदिन निमित्त सर्व विद्यार्थ्यांना बालदिनाच्या शुभेच्छाही दिल्या. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी विद्यालयात लवकरच विज्ञान शाखा सुरू करणार असल्याचे सांगितले.
आ. संजयमामा शिंदे म्हणाले की, कोरोना काळातच दोन वर्षे गेली आहेत. यापुढे होणारा विकास कोणीही थांबवू शकत नाही सर्वांच्या सहकार्याने तो आपण करू. तालुक्यातील विजेचा प्रश्न आपण सोडविणार असल्याचे सांगून सध्या सुरू असलेल्या वीज सबस्टेशनची कार्यक्षमता वाढवून नवीन सबस्टेशनसाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. सोलापूर व पुणे जिल्ह्याला जोडणाऱ्या डिकसळ पुलासाठी ५५ कोटी रुपये मंजूर करून घेण्यात यश आले असून, येत्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये हे काम सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले.
यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी या अभ्यासिकेसाठी एक लाख रुपयांची पुस्तके देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केले.
यावेळी ॲड. बी. डी. कोकरे, रामराव पाटील, उदयसिंह मोरे- पाटील, गणेश करे- पाटील, युवराज भोसले, जयसिंगराव पाटील, सुभाष पाटील, सुर्यकांत पाटील, राजेंद्र बाबर, नवनाथ भांगे, सुहास गलांडे, रामदास गुंडगिरे, महादेव नवले, तानाजी झोळ, डॉ. अमोल दुरंदे, डॉ. गोरख गुळवे, राजेंद्र धांडे, भास्कर भांगे, संग्राम पाटील, नारायण शेंडगे, विलास कोकणे, अॅड. अजित विघ्ने आदीसह तालुक्यातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अॅड. रोहन कोकरे यांनी आभार मानले.




