
करमाळा/प्रतिनिधी


जिल्हाधिकारी सोलापूर यांनी मांगी (ता. करमाळा) गावच्या सरपंच सौ. निर्मला दत्तात्रय बागल यांचे सरपंच पद अपात्र घोषित करत रद्द केले आहे. यामुळे माजी आमदार शामल बागल यांच्या गटाला त्यांच्या गावातूनच हा जबरदस्त धक्का मानला जात आहे.
आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक मांगी ग्रामपंचायत सदस्य सुजीत बागल, कु. स्नेहल अवचर, शहाबाई नरसाळे, चतुराबाई शिंदे यांनी ॲड. कमलाकर वीर यांचेमार्फत जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे सरपंच निर्मला बागल यांनी तब्बल दीड वर्षे ग्रामपंचायतीची सभा घेणे बाबत कसूर केल्यामुळे त्यांना सरपंच पदावरून अपात्र करणेबाबत अपील दाखल केले होते. सुनावणी दरम्यान ॲड. वीर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदी व योग्य न्यायनिवाडे सादर केले होते.
दरम्यान आगामी मकाई व आदिनाथ साखर कारखाना तसेच जि.प. व पं.स निवडणुकांच्या तोंडावर बागल गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत बागल गटाचे ५ तर शिंदे गटाचे ४ सदस्य विजयी झाले होते. यावेळी बागल गटाला स्वतःच्या गावची ही ग्रामपंचायत टिकविणे अशक्य झाले आहे.
या अपिलामधे अर्जदार ग्रामपंचायत सदस्य सुजीत बागल व अन्य ३ यांचेवतीने ॲड. कमलाकर वीर व सरपंच निर्मला बागल यांचेवतीने ॲड. नानासाहेब शिंदे यांनी काम पाहीले. या निर्णयानंतर आ. शिंदे गटाच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.




