
करमाळा/प्रतिनिधी


सध्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने रस्ते विकास आराखडा २०२१ ते २०४१ राबविला जात असून त्यासाठी प्रत्येक गावातील, वाडी – वस्तीवरील रस्ते प्लॅन मध्ये घेण्यासाठी रस्त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून प्रत्येक ग्रामपंचायतींनी, नागरिकांनी आपल्या गावातील, वाडी – वस्तीवरील जास्तीत जास्त रस्ते विकास आराखडा प्लॅन साठी नावे द्यावीत. असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.
प्रत्येक गावातील आणि वाडी वस्तीवरील रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी रस्ते प्लॅनमध्ये असणे आवश्यक असते. रस्ते प्लॅनमध्ये घेण्यासाठी त्याचा २० वर्षाचा विकास आराखडा तयार केला जातो. त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सदर रस्त्यांचे सर्वे करून व शेतकऱ्यांची संमती घेऊन सदर रस्त्यांचा समावेश ग्रामीण मार्गामध्ये केला जात असतो.
महाराष्ट्र शासनाचा २००१ ते २०२१ हा रस्ते विकास आराखडा यापूर्वी तयार करण्यात आलेला होता. २०२१-२२ हे वर्ष कोविड मध्ये गेल्यामुळे २०२३ या वर्षीपासून २० वर्षाचा रस्ते विकास आराखडा २०२१ ते २०४१ हा तयार केला जाणार असून त्यासाठी ग्रामपंचायत संमती असणे आवश्यक आहे. सदर रस्त्यांची यादी तयार झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून त्याचे नकाशे, ना हरकती, संमतीपत्र या आधारे सदर रस्त्यांना ग्रामीण मार्ग मिळवण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठविला जाईल, त्यानंतर त्या रस्त्यांचा समावेश ग्रामीण मार्गामध्ये केला जाईल.




