
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


वाशिंबे, (ता. करमाळा) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून कार्यरत असलेले माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक तानाजी झोळ यांचे सरपंच पद कायम राहिले आहे. त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अर्ज सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी नामंजूर केल्याने हा निर्णय देण्यात आला आहे.
आमदार नारायण आबा पाटील समर्थक नवनाथ मधुकर झोळ यांनी तानाजी झोळ यांना तीन अपत्ये असल्याचा आरोप करत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४(१)(ज-१) अंतर्गत सरपंच पद रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी यांनाही प्रतिवादी करण्यात आले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी व सुनावणी करून मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी दि. १७/१२/२०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार नवनाथ मधुकर झोळ यांचा अर्ज नामंजूर केला. त्यामुळे तानाजी झोळ यांचे सरपंच पद अबाधित राहिले आहे. संबंधित निर्णयाची प्रत तहसीलदार, करमाळा यांनाही पाठविण्यात आली आहे.
गावातील विकास कामांचा हा विजय– तानाजी झोळ
वाशिंबे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जनतेने भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर कोणतेही राजकारण न करता गावाच्या सर्वांगीण विकासालाच प्राधान्य दिले. तत्कालीन आमदार व सध्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून घेण्यात आला. विकासाचा हाच मार्ग खटकत असल्याने विरोधकांनी माझ्याविरोधात अपील दाखल केले; मात्र ते नामंजूर झाले. हा विकास कामांचा विजय आहे, अशी भावना सरपंच तानाजी झोळ यांनी व्यक्त केली.
यापुढील काळात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री जयकुमारजी गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिनजी कल्याणशेट्टी, माजी आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक निधी आणून गावाचा विकास अधिक गतीने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.




