आवाटी सबस्टेशन झाले तरी पुर्वभागाला पुन्हा सहा तासच वीजपुरवठा! युवासेनेचा आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


आवाटी सबस्टेशन चे काम झाल्यानंतर तरी पुर्व भागातील हिवरे, हिसरे, कोळगाव, निमगाव मिरगव्हाण (लावंड वस्ती) गौंडरे या गावांना आठ तास पुर्ण दाबाने वीजपुरवठा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र महावितरणच्या हलगर्जी पणामुळे कोळगाव सबस्टेशन वरील किरकोळ समस्या सोडवल्या जात नसल्याने शेतकऱ्यांना पुन्हा सहा तास वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर कोळगाव सबस्टेशन वरील ब्रेकर दुरूस्त करून पुर्ण दाबाने दिवसपाळीत वीजपुरवठा करावा अन्यथा युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांकडून तिव्र आंदोलन करू असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे.
महावितरणला दिलेल्या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की, आवाटी सबस्टेशन होण्या अगोदर कोळगाव सब-स्टेशन वरून संपूर्ण भागाला वीजपुरवठा होत होता. मात्र आवाटी सबस्टेशन झाल्यानंतर आवाटी, नेरले व गौंडरे हद्दीतील (बैल म्हसोबा) हे तीन फिडर वेगळे केले तरी हिवरे, गौंडरे, कोळगाव, निमगाव, मिरगव्हाण (लावंड वस्ती) या भागातील शेतकऱ्यांना पुन्हा वीज टंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देऊ असे सरकार सांगत असले तरी कोळगाव सबस्टेशन वरून उन्हाळ्यात दिवसा फिडर लोड घेत नाही असे सांगून रात्र पाळीत वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून रात्रीच्या अंधारात शेतीला पाणी द्यावे लागत आहे. आठ तास असणारी वीज कालपासून पुन्हा सहा तासावर आल्याने शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला आहे.
अनेक दिवसांपासून रात्रपाळीत तसेच पुर्ण दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने विद्युत पंप, स्टार्टर, मेगा यामध्ये बिघाड होवुन आर्थीक भुर्दंड सोसावा लागत आहे. कोळगाव येथील सबस्टेशन वरील ब्रेकर अनेक दिवसांपासून नादुरुस्त झाला आहे अकरा केव्हीचा (११kv) हा ब्रेकर बसवल्यानंनतर एक फिडरचा लोड कमी होणार आहे. हा ब्रेकर नादुरुस्त असल्याने गाजावाजा करून बसवलेला ३\१५ चा ट्रान्सफार्मर देखील धुळखात पडून आहे. दिवसपाळीत उन्हामुळे लोड येत असल्याने सध्या रात्री दहा ते सकाळी सहा व सकाळी सहा ते दूपारी दोन, दुपारी दोन ते रात्री दहा असा वीज पुरवठा होत आहे. तो रात्री बारा ते सकाळी आठ, सकाळी आठ ते दुपारी चार व दुपारी चार ते रात्री बारा अशा वेळेत वीजपुरवठा करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. जेणेकरून दिवसा वीज उपलब्ध होऊन शेतीला पाणी देणे सोयीचे होईल. तरी वरील मागण्यांची दखल घेऊन आठ दिवसांत कार्यवाही न झाल्यास जेऊर महावितरण कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करू असा इशारा फरतडे यांनी दिला आहे.
सध्या शेतकऱ्यांकडून केळी व उसाची नव्याने लागन केली जात आहे तर अनेक शेतकऱ्यांची केळी उस तुटून गेल्याने खोडवा पिकांचा फुटवा होण्यासाठी पाण्याची गरज आहे. जनावरांच्या चार्यासाठी देखील पाणी गरजेचे आहे अशातच दोन तास वीजकपात करणे शेतकऱ्यांसाठी नुकसान कारक आहे. तरी सध्या सुरू असलेल्या पाळ्यांचे वेळापत्रक बदलून शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होईल असा पाळ्या कराव्यात व तात्काळ आठ तास वीज उपलब्ध करून द्याव्यी.
• शंभूराजे फरतडे- युवासेना, तालुकाप्रमुख



