
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


हिवरे नागोबाचे येथील जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती निमित्त रांगोळी स्पर्धा, तसेच वक्तृत्व स्पर्धा देखील घेण्यात आल्या. यावेळी अंगणवाडी सेवीका, मदतनीस, तसेच बचतगट सखींच्या व सावित्रीबाईंच्या वेशात आलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शिवाजी साबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष शंभूराजे फरतडे, उपाध्यक्ष नितीन मगर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंभूराजे फरतडे म्हणाले की, ज्या काळात स्त्रीने घराबाहेर पडणे म्हणजे पाप समजले जात होते, अशा काळात शैक्षणिक, सामाजिक, अंधश्रद्धा, रुढी परंपरागत समजुतीने ग्रासलेल्या समाजास प्रबोधन करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी १ जानेवारी १८४८ रोजी पहिली मुलींची शाळा काढून नंतर अनेक शाळा व वसतिगृह चालविले. सावित्रीबाई फुले ह्या केवळ शिक्षिकाच होत्या असे नव्हे तर त्या पती ज्योतिबाच्या सर्व आंदोलनात साथ देणाऱ्या एक कृतिशील कार्यकर्त्या, समाजसेविका होत्या. त्यांच्या विचारांवर वाटचाल करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यानी अभ्यासात झोकून देऊन यशस्वी व्हावे. आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करून आपल्या शाळेचा, गावचा नावलौकिक वाढवावा हीच खरी सावित्रीबाईंना आदरांजली ठरेल मत व्यक्त केले.
यावेळेस मुख्यध्यापक शिवाजी साबळे, अंगणवाडी सेवीका लोहार मॅडम यांनी सावित्रीबाईंच्या वेशात आलेल्या स्वराली बिरू ठोंबरे, राधा मोतीराम फरतडे, धनश्री आबा ठोंबरे या मुलींनी मनोगत व्यक्त केले. आभार शिवाजी खरात यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतिश सुर्यवंशी, जालिंदर हराळे, शिवाजी खरात, पोपट दुधाळ या शिक्षकांनी परिश्रम घेतले.



