
माय मराठी न्यूज नेटवर्क


माळीनगर ते टेंभुर्णी दरम्यान शालेय विद्यार्थ्यांसाठी बस सेवा चालू करण्याची मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश इंगळे यांच्या वतीने अकलूजचे आगार प्रमुख प्रमोद शिंदे साहेब यांच्याकडे निवेदना मार्फत केली आहे. यावेळी ओम पराडे, रोहित इंगळे, तृप्ती इंगळे, साक्षी इंगळे, हर्षदा पराडे, सायली पराडे यांच्यासह अनेक विदयार्थी उपस्थित होते.
माळीनगर ते टेंभुर्णी ही बस सायंकाळी ५ वाजता माळीनगर वरून चालू करावी. माळीनगर ते टेंभुर्णी दरम्यानच्या खुळे वस्ती, मस्के वस्ती, शेवरे, संगम, जांभूळबेट, गणेशगांव, लवंग, सेक्शन पंचवीस, चार पायरी पूल, दोन नंबर गट, तांबवे पाटी या गावावरून शेकडो विद्यार्थी हे माळीनगर येथे शिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यांची शाळा ०४:३० वाजता सुटते. त्यांना घरी जाण्यासाठी अकलूज वरून बस माळीनगर मार्गे असतात. परंतु, अकलूज वरून ही शेकडो विद्यार्थी या सर्व गावातील असल्यामुळे माळीनगर येथील शाळकरी मुलांना बस मध्ये जागा नसते. त्यामुळे मुलांना तासन तास ताटकळत बसावे लागते. रोज मुलांना घरी पोहचण्यासाठी सात ते आठ वाजतात.
विद्यार्थी हा देशाचा कणा असतो. जर विद्यार्थ्यांना घरी पोहचण्यास सात आणि आठ वाजत असतील तर त्यांनी घरी जाऊन जेवण कधी करायचं? आणी अभ्यास कधी करायचा? हा मोठा प्रश्न आहे. तरी या सर्व बाबीचा विचार करता माळीनगर ते टेंभुर्णी सायंकाळी ५ वाजताची बस सेवा शनिवार, रविवार व शासकीय सुट्टी सोडून इतर दिवशी चालू करावी. अशी मागणी युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी केली असून अन्यथा सोमवार दि. २९ जुलै २०२४ रोजी माळीनगर येथे सायंकाळी ५:०० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा ईशारा ही त्यांनी शेवटी दिला आहे.



