केम प्रतिनिधी/संजय जाधव


सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रूग्ण संख्या वाढू लागली आहे. ही साखळी तोडण्यासाठी सोलापूरचे मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशाने जिल्ह्यांतील करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस व माढा या पाच तालुक्यात दि.१३ आॅगस्ट पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु दि.१४ रोजी नागपंचमी हा सण आहे. या सणासाठी दुकानदारांनी मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केला आहे. तरी यामध्ये शिथिलता आणून ही संचारबंदी दि. १५ ऑगस्ट पासून लागू करावी अशी मागणी करमाळा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह ओहोळ यांनी मा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे कडे ई-मेल द्वारे केली आहे.
सदर मेलद्वारे त्यांनी असे म्हटले आहे की, सोलापूर जिल्ह्यातील ज्या पाच तालुक्यांमध्ये दि. १३ ऑगस्ट पासून संचारबंदी लागू होणार आहे त्यामध्ये करमाळा तालुक्याचाही समावेश आहे. परंतु, १४ ऑगस्ट रोजी असलेल्या नागपंचमी या सणासाठी व्यापारी वर्गाने माल खरेदी केला आहे. संचारबंदी लागणार असल्याने दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. अगोदरच गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या सततच्या लॉकडाऊन मुळे दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. दुकानदारांना आपली दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. कोरोनाचे रूग्ण ग्रामीण भागात सापडू लागले आहेत याला आमचा विरोध नाही. परंतु, या संचारबंदी मध्ये शिथिलता आणून संचारबंदी दि. १३ ऑगस्ट ऐवजी १५ ऑगस्ट पासून लागू केल्यास दुकानदारांनी आणलेला पंचमीचा माल त्यांना विकता येईल. दुकानदारांना चार पैसे मिळतील आणि खरेदी केलेला माल ही विकला जाईल. तरी माझी मा. जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की, संचारबंदी मध्ये दोन दिवसांची शिथीलता मिळावी. सर्व दुकानदारही कोरोना नियमांचे पालन करून आपला व्यवसाय करतील अशी मागणी त्यांनी केली आहे.




