
करमाळा/प्रतिनीधी


शिक्षण आणि आरोग्य हे मानवाचा विकास तसेच समाजाची गुणवत्ता यांचे सर्वात मोठे बोधचिन्ह आहे. शिक्षण जितके प्रगत होईल आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत जेवढ्या सहजपणे पोहोचेल, तो समाज तेवढाच प्रगत आणि विकसित बनेल. याचप्रकारे मानवाचे आरोग्य जेवढे चांगले राहिल, तेवढेच मानवाचे वैयिक्तक आणि सामाजिक जीवन सुखमय आणि दृढ होईल. त्यामुळे हे दोन मुख्य घटक मजबूत व दर्जेदार ठेवण्यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी प्रयत्न करावेत. असे आवाहन गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी केले.
हिवरे (ता. करमाळा) येथील शिवप्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आरती नंतर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. या प्रसंगी शिवप्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे देखील त्यांनी कौतुक केले. मंडळानी अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर द्यावा असे आवाहन ही त्यांनी शेवटी बोलताना केले.
यावेळी शिवसेना माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे, सरपंच दत्तात्रय माळी, शिवप्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोतीराम फरतडे, ग्रामपंचायत उपसरपंच दिलीपभाऊ फरतडे, सदस्य अतुल फरतडे, शाळेचे मुख्याध्यापक निळकंठ हनपुडे, शाळा उपाध्यक्ष नितीन मगर, आरोग्य सेविका खोबरे सिस्टर, डाॅ. शिंदे उपस्थित होते.



