
करमाळा/प्रतिनिधी


धर्मवीर आनंद दिघे यांनी स्वतः सत्तेपासून लांब राहून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवून समाजातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले. ही गोष्ट घटना अभिमानास्पद असून अशा पद्धतीचे राजकारणी, समाजकारणी समाजात निर्माण झाले तर खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना न्याय मिळेल. असा विश्वास करमाळ्यातील जेष्ठ पत्रकार नासिर भाई कबीर यांनी व्यक्त केला.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यालयात स्व. दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख महेश चिवटे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निखिल चांदगुडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटणे, पत्रकार नरसिंह चिवटे, हिवरवाडी ग्रा. सदस्य जयराज चिवटे, रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण, कोळगाव शाखाप्रमुख नागेश चेंडगे, प्रसिद्धी प्रमुख केशव साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
धर्मवीर आनंद दिघे हे स्वतःच्या प्रपंचापासून, स्वतःच्या स्वार्थापासून आयुष्यभर दूर राहिले. जेथे अन्याय होत असेल तेथे त्यांनी स्वतः उडी घेऊन सर्वसामान्याला साथ दिली. वेळप्रसंगी कायदा हातात घेतला, स्वतः तुरुंगात गेले, पण सत्याची साथ सोडली नाही. असे व्यक्तिमत्व हे खऱ्या अर्थाने सध्याच्या राजकारण्यांना डोळ्यात अंजन घालणारे नेतृत्व आहे. सध्या लोकशाहीचे वातावरण अत्यंत खराब झाले असून सत्तेतून राजकारण व राजकारणातून सत्ता हे सूत्र वाढले आहे.
आज धर्मवीर आनंद दिघेंच्या आदर्श डोळ्यापुढे ठेवून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे आरोग्याचे प्रश्न सोडवत आह. हीच खरी धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली आहे. असेही शेवटी ज्येष्ठ पत्रकार नाशिर कबीर यांनी सांगितले.



