
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील ३ जिल्ह्यांच्या सिमेवर असणारा ब्रिटीश कालीन डिकसळचा पुल नुकताच खचला आणि वहातुक बंद झाली. त्यामुळे प्रवासी नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्यांचा पर्यायी प्रवास कठीण झाला. नवीन पुलाच्या बांधकामास वेळ लागणार असल्यामुळे पश्चिम भागाची तात्काळ गरज ओळखून जुन्या पुलाचे डागडुजीसाठी २ कोटी रुपये ची तरतुद आ. संजयमामा शिंदे यांनी केली.
परंतु करमाळा तालुक्यासह ३ जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचा प्रश्न महत्त्वाचा होता, त्यासाठी आ. संजयमामा शिंदे ५५ कोटी रुपयांची मंजुरी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मिळवली होती. सदर कामावरती नवीन सरकारने स्थगिती दिलेली होती, ती स्थगिती उठवून प्रत्यक्षात त्या पुलांचे कामकाज सुरू होण्याच्या दृष्टीने पुलाचे ३८ कोटी ६६ लाख ३१ हजार ४७० रुपयाचे टेंडर फायनल झाले आहे. पुलासाठी एकूण ५५ कोटी निधी मंजूर असून या पुलाला जोडणाऱ्या जोड रस्त्याचे काम उर्वरित निधी मधून केले जाणार आहे. त्याचे टेंडर नंतर निघणार आहे.
दि. १० जानेवारी २०२३ पासून माझा करमाळा तालुक्यामध्ये गाव भेट दौरा सुरू आहे. विशेषतः पश्चिम भागातील वेगवेगळ्या गावांमध्ये गेल्यानंतर डिकसळ पुलाविषयी लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. या दरम्यानच हा पुलही खचला. या सर्व घडामोडीवरती मी बारीक लक्ष ठेवून होतो. सदर पुलाचे टेंडर ३१ जानेवारी पर्यंत फायनल होईल आणि प्रत्यक्षात उजनी धरणाचे पाणी मे महिन्यात वजा पातळीला गेल्यानंतर पुलाचे कामही सुरू होईल असे नियोजन मी बोलून दाखवत होतो. प्रत्यक्षात टेंडर प्रसिद्धीची जाहिरातही आलेली आहे त्यानुसार पुढील कामकाज निश्चितपणे होईल. या पूलासाठीचा निधी हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित दादा पवार यांनी विशेष तरतूद करून मंजूर केला.
आ. संजयमामा शिंदे, (करमाळा विधानसभा मतदासंघ)




