
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


पारेवाडी (ता. करमाळा) येथील रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळवा. यासाठी केत्तुर व केत्तूर परिसरातील ग्रामस्थ तसेच प्रवासी संघटना यांच्यामार्फत विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांना निवेदन दिले असल्याची माहिती केतुरचे माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने यांनी दिली आहे.
मध्य रेल्वेचे पारेवाडी रेल्वे स्थानक हे महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून या ठिकाणी एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा यासाठी केत्तूर येथील ग्रामस्थ सन १९९६ पासून प्रयत्न करीत आहेत. परंतु अद्याप या ठिकाणी एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळालेला नाही. या करिता येथील प्रवासी संघटना व ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रयत्न करूनही ही मागणी पूर्ण झालेली नाही. या ठिकाणी सन १९९६ मध्ये रेल्वे रोको आंदोलन देखील झालेले होते. सध्या मध्य रेल्वेचे दुहेरीकरणाचे काम पूर्णत्वास आलेले असून या स्टेशन व परिसरातील गावांचा विचार करता या ठिकाणी एक्सप्रेस गाडीला थांबा देणे अतिशय गरजेचे असले बाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापकाना दिलेल्या निवेदनात म्हटलेले आहे.
सदरचे निवेदन माननीय विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांना देण्यात आलेले असून याबाबतची माहिती माजी सरपंच ॲड. अजित विघ्ने, ग्रा.पं. सदस्य महादेव नगरे यांनी दिली.




