कृषी विभागाकडून ११ ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन; नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन
प्रतिनिधी/मनोज बोबडे


महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) करमाळा यांचे वतीने करमाळा तालुका परिसरातील शेत शिवारामध्ये नैसर्गिकरीत्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या/रानफळे यांचे महत्व व आरोग्य विषयक माहिती सर्वसामान्य नागरीकांना होणे आवश्यक आहे. सदर रानभाज्या नैसर्गिकरीत्या येत असल्यामुळे त्यावर रासायनिक किटकनाशके फवारणी करण्यात येत नाही. शहरी लोकांमध्ये याबाबत जागृती करणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी दि. ०९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये रानभाजी महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
त्यानुसार करमाळा तालुक्यामध्ये गुरुवार दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी पंचायत समिती सभागृह, करमाळा येथे सकाळी १०:०० वाजता रानभाजी महोत्सव साजरा करण्यासाठीचे नियोजन करण्यात आलेले आहे. तरी सदर रानभाजी महोत्सवामध्ये जे शेतकरी रानभाज्या विक्री करण्यास इच्छुक आहेत त्यांनी आपली माहिती दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी पर्यंत करमाळा तालुका कृषि अधिकारी कार्यालयास कळवावीत. रानभाजी महोत्सवा मध्ये भाग घेणाऱ्या लाभार्थींना कृषि विभागाचे वतीने प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सदर रानभाजी महोत्सवामध्ये सहभाग घ्यावा असे कृषि विभागाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
आपल्या भागात येणाऱ्या काही रानभाज्याची नावे –
कडवंची, तांदुळजा, चिघळ, माठ, कुंजीर, हादगा, अळू, पाथरी, उंबर फळे, शेवग्याची पाने, सराटा, कुरडू, आघाडा, केना, खापरखुटी, गुळवेल, कपाळफोडी, भुई आवळा, पिंपळाची पाने, टाकळा/कास्वद इत्यादी प्रकारच्या रानभाज्या आपल्या परिसरात आढळून येतात.



