
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


तरुणांनी स्वतःचे गाव सोडून शहरात जाऊन नोकरी करण्यास प्राधान्य दिले तर स्वतःचे व्यक्तिमत्व तयार होऊन अनुभवातून एक सक्षम व्यक्ती तयार होतो. त्यामुळे जीवनात प्रगती करायची असेल तर गावाबाहेर जाऊन नोकरी करण्याचे धाडस केले पाहिजे, असे मत दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन प्राध्यापक रामदास झोळ यांनी व्यक्त केले. आज करमाळा येथे दत्तकला शिक्षण संस्थेच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात १२ कंपन्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन जवळपास ८० तरुणांना ऑन द स्पॉट नोकरीचे नियुक्तीपत्र दिले.
या कार्यक्रमासाठी करमाळ्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, सचिव नासिर कबीर, पत्रकार दिनेश मडके, पत्रकार जयंत दळवी आदीजण उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या सचिव मायाताई झोळे यांनी स्वतःचे अनुभव सांगताना मी सुद्धा ग्रामीण भागातील मुलगी असून एकोणिसाव्या वर्षापासून मी धाडसाने पुढे आल्यामुळे आज दत्तकला शिक्षण संस्थेचे मी यशस्वीपणे कामकाज पाहत आहे.
यावेळी सूर्यकांत कोकणे यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्राध्यापक रामदास झोळ यांनी स्वतःच्या खर्चातून हा नोकरी महोत्सव करमाळ्यात आयोजित करून युवकांना नोकरीचे दालन उपलब्ध करून दिले हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे यांनी या नोकरी महोत्सवामध्ये ज्यांना नोकरी लागणार नाही, त्यांना दत्तकला शिक्षण संस्थेत नोकरी देण्याची सोय प्राध्यापक झोळ दांपत्यांनी करावी अशी मागणी केली. करमाळा तालुक्यातील जनतेसाठी सातत्याने झोळ कुटुंब देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे. असे सांगून त्यांचा करमाळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला. या नोकरी महोत्सवासाठी इच्छुक तरुण- तरुणींनी मोठी गर्दी केली होती.




