
- माय मराठी न्यूज नेटवर्क
राज्यातील कमी पर्जन्यमान असलेल्या १७ जिल्ह्यातील ९२ नगरपालिका व ०४ नगरपंचायतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. या कार्यक्रमानुसार २० जुलै पासून निवडणूकीची प्रक्रिया सुरु होणार असून १८ ऑगस्ट रोजी मतदान व १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे.


या निवडणूकीची प्रक्रीया २० जुलैपासून सुरु होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार २० जुलै रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच २२ ते २८ जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. छाननी व वैध नामनिर्देशन पत्र असलेल्या उमेदवारांची यादी २९ जुलै रोजी जाहिर केली जाणार आहेत. तसेच ०४ ऑगस्ट पर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतर लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि ०४ नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत.




