कुकडी धरणातील अतिरिक्त पाणी मांगीसह इतर तलावात सोडा; दिग्विजय बागल यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर कुकडी लाभक्षेत्रातील धरणांमध्ये उपलब्ध असलेले अतिरिक्त (ओव्हरफ्लोचे) पाणी करमाळा तालुक्यातील मांगी तलावासह इतर तलावांमध्ये तातडीने सोडण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते दिग्विजय दिगंबरराव बागल यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात बागल यांनी म्हटले आहे की, जून महिना संपत आला तरी करमाळा तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे जनावरे आणि नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची ही तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कुकडी लाभक्षेत्रातील माणिकडोह, येडगाव, डिंभे, वडज आणि पिंपळगाव जोगे या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून या धरणांमधील अतिरिक्त पाणी करमाळा तालुक्यातील मांगी, वीट, भोसे, सावडी आणि कोर्टी येथील तलावांमध्ये सोडून ते भरून दिल्यास पाणीटंचाईची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीवरही नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी निवेदनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचे दिग्विजय बागल यांनी सांगितले असून करमाळा तालुक्यातील नागरिकांना भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी कुकडी धरणातील अतिरिक्त पाणी तातडीने मांगीसह संबंधित ईतर तलावांमध्ये सोडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी दिग्विजय बागल यांनी केली आहे.



