प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


कोरोनाच्या भयानक संकटावर मात करीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून दमदार कामगीरी केली असुन देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ते टाॅप वर राहिले आहेत. विरोधकांच्या टिकांना भिख न घालता महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक लोकहितांचे निर्णय घेतले आहेत ते निर्णय व ठाकरे सरकारच्या योजना गाव खेड्यातील जनतेपर्यंत पोहचवा. असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षनिरीक्षक नगरसेवक अनिल कोकीळ यांनी शिवसैनिकांना केले. करमाळा येथे झालेल्या शिवसंपर्क अभियान मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी अधिक बोलताना कोकीळ म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने उद्योग क्षेत्रात मोठी कामगिरी केली. निर्यात वाढवण्यासाठी ठाकरे सरकारने निर्यात प्रोत्साहन परिषदेची स्थापना केली. सरकारने उद्योगांना प्रोत्साहन आणि वेगवेगळ्या सुविधा देण्याचे काम केले. तसेच ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या कार्यक्रमांतर्गत निर्यात क्षमता वाढवण्याचा सरकारने प्रयत्न केला. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यात ३०.७७ लाख शेतकऱ्यांना १९,६४४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यामुळे सरकारने १० हजार कोटींचा निधी मंजूर केला. अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना १० हजार रुपये तर फळ उत्पादकांना २५ हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत करण्यात आली. राज्यातील गृह विभागाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. हवालदार पदासाठी ५२९७ पदांच्या भरतीला मान्यता देण्यात आली. कोरोना काळात कर्तव्यावर असताना ३९० पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाला. या पोलिसांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत करण्यात आली. सरकारने प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेशी जोडलं. त्यात एकूण एक हजार रुग्णालयांचा समावेश करण्यात आला. यामध्ये २८८ सरकारी तर ७१२ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. या योजनेंतर्गत ३४ विशेष सेवा देण्यात आल्या. कोरोना काळात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, केंद्र व राज्य शासन अंगीकृत व्यवसाय, महामंडळे आणि बँका याच्यामार्फत नोकरी, उत्सुंक उमेदवारांना उत्तेजन देऊन स्वयंरोजगारा करिता प्रवृत्त करण्या्करिता स्वयंरोजगाराच्या विविध योजनांची अंमलबजावणी केली गेली आहे. मात्र शिवसैनिक या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यात कमी पडत असुन ठाकरे सरकारचे निर्णय व योजना प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले पाहिजे असे आवाहन केले. तसेच प्रत्येक गावात शाखा व घर तेथे शिवसैनिक हे अभियान राबवुन ग्रामीण भागात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट करुन भविष्यात स्वबळावर भगवा फडकवण्यासाठी सज्ज रहा असे सांगताना पदाधिकाऱ्यांनी कामचुकार पणा केल्यास कारवाईचा इशारा दिला.
यावेळी सहकार आघाडी राज्य उपाध्यक्ष प्रदिप खोपडे, वक्ते डाॅ. अखिलेश निगुडकर, जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, युवा सेना विस्तारक नगरसेवक उत्तम आयवळे, मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, युवा सेना जिल्हाप्रमुख सचिन बागल, सहकार आघाडी जिल्हाप्रमुख आनंद यादव, तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, शहर प्रमुख प्रवीण कटारीया, संघटक संजय शिंदे, माजी तालुकाप्रमुख शाहुराव फरतडे, उपतालुकाप्रमुख श्रीहरी तळेकर, प्रमोद वागज, भिवा शेजाळ, बंडु शिंदे, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, उपजिल्हाप्रमुख आशा टोनपे, आशा काळे यांच्यासह शेकडो शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.
यावेळी मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी मरेपर्यंत भगवा सोडणार नसल्याचे ठणकावून सांगीतले. तसेच उजनीतुन पाणी उचलण्यासाठी आणलेली लाकडी निंबोडी योजना रद्द करावी अशी मागणी केली. युवा सेना समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी प्रास्ताविक करताना दहिगाव योजनेस शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे तसेच कुकडी चे पावसाळ्यातील कर्नाटकात जाणारे ओव्हर फ्लोचे पाणी सिना कोळगाव धरणात वळवावे अशी आग्रही मागणी केली. जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी बंडखोर पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. पक्षनिरीक्षक अनिल कोकीळ यांनी तालुक्यातील सर्व समस्या पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवणार असुन त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिवसैनिकांना दिले.
सुत्रसंचालन युवा सेना समन्वयक शंभुराजे फरतडे यांनी केले तर आभार शहर प्रमुख प्रवीण कटारीया यांनी मानले.
जेष्ठ शिवसैनिक यांचा सत्कार
शिवसेना स्थापन झाल्यानंतर करमाळ्याचे पहिले तालुकाप्रमुख रत्नाकर आडाणे, शाखा प्रमुख सुर्यकांत पाटील, विष्णू शिंदे, अविनाश गाडे या जेष्ठ निष्ठावंत शिवसैनिकांचा सत्कार या वेळेस करण्यात आला.




