प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


पूर्व भागातील जनतेच्या मागणी नुसार आवाटी येथील सबस्टेशनला मंजूरी मिळाली आहे. त्याचबरोबर कोर्टी परीसरातील नागरीकांच्या आग्रही मागणीचा विचार करून उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेवून तेथे ॲडीशनल ट्रान्सफॉर्मर बसविण्यास ना. राऊत यांनी मंजूरी दिली असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सीएमडीना तशा आशयाचे आदेश दिलेले आहेत. अशी माहिती करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाने आणलेल्या कृषी पंप धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्यात महावितरणचे बारामती परिमंडळ राज्यात अग्रेसर राहिले आहे. आतापर्यंत या धोरणातून बारामती परिमंडळ ने ५०२ कोटींची वसुली केली आहे. या धोरणातील तरतुदीनुसार वसूल झालेल्या रकमेतील ६६ टक्के रक्कम कृषी आकस्मिक निधी या योजनेखाली नवीन वीज जोडण्या, नवीन उपकेंद्रे व उपकेंद्र क्षमता वाढ यासाठी वापरली जाणार आहे. बारामती परिमंडळात पुण्यातील सहा तालुके व सोलापूर आणि सातारा हे दोन जिल्हे येतात. वसुल झालेल्या रकमेतून ३३ टक्के निधी गाव पातळीवर व ३३ टक्के निधी जिल्हा पातळीवर विजेच्या पायाभूत सुविधा व नवीन कनेक्शन साठी खर्च करण्यात येत आहे.
याच कृषी आकस्मिकता निधीतून करमाळा तालुक्यात आवाटी येथे नवीन ३३/११ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र निर्माण करणे. तसेच कोर्टी येथील ३३/११ केव्ही क्षमता असलेल्या वीज उपकेंद्रांमध्ये नवीन ५ मेगावॅट क्षमतेच्या ट्रांसफार्मर ला मंजुरी मिळाली आहे.
आवाटी येथे नवीन ३३/११ केव्ही सबस्टेशनची उभारणी व कोर्टी येथे ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या वाढीव क्षमतेला मंजुरी मिळाली असून लवकरच टेंडर निघाल्यानंतर हे काम सुरू होईल. -सुमित जाधव
उप अभियंता महावितरण, करमाळा
करमाळा तालुक्याचा वीज प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्नशील
करमाळा तालुक्यात पूर्व भाग तसेच पश्चिम भागात विजेचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा होता. पूर्व भागात सातत्याने कोळगाव धरण भरत असल्यामुळे तेथील विज प्रश्न सोडवण्यासाठी आवाटी येथे येथे नवीन उपकेंद्र उभारणीस मंजुरी मिळाली आहे. तसेच पांडे येथे उपकेंद्राच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यास लवकरच मान्यता मिळेल. पश्चिम भागातील कात्रज येथे नवीन उपकेंद्राच्या उभारणीचे काम सुरू आहे. तसेच राजुरी येथे नवीन उपकेंद्र उभारणीसाठी आपले प्रयत्न सुरू असून त्यास लवकरच मंजुरी मिळेल. कोर्टी येथील उपकेंद्राच्या क्षमतेमध्ये वाढ करण्याच्या कामास नुकतीच मंजुरी मिळाली आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पुरेशा दाबाने वीज उपलब्ध होईल. या उपकेंद्रांच्या उभारणीनंतर इथून पुढेही करमाळा तालुक्याचा वीज प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. आमदार संजयमामा शिंदे, करमाळा
अत्यंत महत्वाच्या अशा वीज प्रश्नांबाबत आमदार शिंदे हे सकारात्मक प्रयत्न करून निर्णय घेत असल्यामुळे तालुक्यातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.



